© नीलिमा देशपांडे
विविधतेने नटलेल्या आपल्या भारतातील राजस्थान राज्यात असणारे 'आभानेरी' हे छोटेसे खेडेगाव प्रसिद्ध आहे त्याच्या 'चांदबावडी' या स्टेप वेल म्हणजे अनेक पायऱ्यांनी बनलेल्या विहिरीसाठी!
स्टेपवेल किंवा पायऱ्यांनी बनलेली विहीर?
होय !
भारतात आजही जवळ पास 2000 अशा स्टेप वेल आहेत ज्या ऐतिहसिक काळात बांधल्या गेल्या होत्या.
मोठ्या आकारमानाच्या, खुप खोल, आकाराचे बंधन नसलेल्या त्यामूळे विविधता दर्शवत अनेक पायर्यांनी बनलेल्या ह्या विहिरी त्या काळापासून आजही आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून मान्यता प्राप्त व खर्या अर्थाने देशी- विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत.
आभानेरी हे 'बांदीकुई' ह्या तालुक्यातील एक छोटेगाव आहे.
तिथल्या स्टेपवेलला 'चांदबावडी' हे नाव तिथल्या राजा 'चंदा' याच्या नावावरून देण्यात आले असावे अशी मान्यता आहे.
या ठिकाणचे 'हर्षद माता मंदिर' देखील प्रसिद्ध आहे आणि चांदबावडी प्रमाणेच तेथे कोरीव कामाचं साम्य दिसून येते.
आठव्या ते नवव्या शतकातील केलेले हे विहिरीचे बांधकाम आहे. चांद बावडी हे पाण्यात बांधलेल्या बांधकामाच्या अनेक वास्तू मधील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे.
या विहिरीचा खालचा खोलवर असलेला भाग हा आठव्या शतकात बांधलेला असून त्यावर नंतर बांधला गेलेला पॅलेस हा चव्हाण राज्यकर्त्यांकडून बनवला व वापरला गेला होता.
त्यापॅलेसमधील खोल्यांमध्ये आता जरी पर्यटकांना जाण्यास प्रवेश मान्य नसला तरी, मोगल काळापर्यंत त्याचा वापर केला जात होता.
अठराव्या शतकात मोगल काळात वरचा भाग बांधला गेलेला आहे. मोगल काळातच मुघलांनी आर्ट गॅलरी आणि विहिरीच्या भोवती एक भिंत देखील उभी केली.
अनेक पायऱ्यांनी बनलेली ही विहीर अनेक उद्देशांसाठी उपयोगी होती.
काही धार्मिक विधी देखील यात केले जायचे.
तसेच पाण्याची साठवण म्हणून देखील या विहिरीचा उपयोग होता आणि नंतर त्यावर बांधलेला महाला मुळे तेथे अनेक राजे त्यांच्या राजकीय बैठकीघेत. त्या काळातील राजांची गुप्त आणि महत्त्वाच्या बैठका घेण्याची ती जागा होती.
चांदबावडी ही विहीर पाश्चिमात्य आर्किटेक्चरल बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
ही विहिर चौकोनी आकाराची असून बरीच खोल आहे. बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक भलेमोठे मंदिर देखील आहे.यामध्ये जवळपास 3500 पायऱ्या असून तेरा मजल्यांमध्ये त्या विभागल्या गेल्या आहेत.
खूप खोल आणि मोठ्या विहिरींमधील 'चांदबावडी' ही विहीर भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी व सर्वात खोल (100 फुट खोल) अशी प्राचीन विहीर आहे.
या विहिरीमध्ये शक्य होईल तितके जास्तीत जास्त पाणी साठवणे हा त्यावेळी लोकांचा हिला बांधण्यामागे प्रमुख उद्देश होता.
विहिरीच्या तळाकडील भागात नेहमी तापमान त्याच्या वरच्या भागापेक्षा 5 ते 6 डिग्री अधिक थंड असते.
पुर्वीच्या काळात, खासकरुन उन्हाळ्यात जेंव्हा राजस्थानातील प्रचंड गरमीचा त्रास होई तेंव्हा पायर्या उतरून खालच्या भागात गेल्यानंतर लोकांना भयंकर उकाड्यापासून स्वतःचे संरक्षण करता येत असे.
त्या थंडजागी लोकांना एकत्र जमण्याची, बसण्याची देखील ती एक प्रकारे केलेली सोय होती.
आपल्या स्वागतासाठी जणू ही चांदबावडी तत्परतेने ....
" पधारो सां !"
म्हणत सदैव उभी आहे.
* सदर विचारांच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.
*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.
* फोटो साभार Google and Pixabay
*©®: नीलिमा देशपांडे




