सोबत

© धनश्री दाबके



"येतोय का रे बेसनाचा वास बाहेरपर्यंत, कौस्तुभ ?" अनघा स्वैपाकघरातून लाडूसाठी बेसन भाजता भाजता ओरडली. त्यावर कौस्तुभचं काहीच उत्तर नाही आलं.

हा बसला असेल कानात त्या इअर फोन्सचे बोळे घालून. त्यामुळे त्याला ऐकू नाहीच जाणार. अनघा असा विचार करत असतांनाच कौस्तुभ आत आला.

" अरे वा वा. बेसन लाडू वाटतं. काय मस्त वास यतोय ग आई. बेसन गार झाले की लगेच लाडू वळून टाकू. मी पण बसतो तुझ्या बरोबर आज आणि हो, चकल्या पण घरी कर हा ह्यावर्षी. मी देईन तुला त्या सोऱ्यामधून पाडून. तू फक्त त्या तळ."

"अगदी आहे तस्सा आहेस बघ. तुला आठवतय? लहानपणीही असाच लाडू वळायला बसायचास आजी बरोबर." अनघा कौतुकाने म्हणाली.

"हो आठवतय ना. आजीच्या हातचे लाडू म्हणजे माझा जीव की प्राण. आपली आजी होतीच सुगरण. रव्याचा लाडू खावा तर तिच्याच हातचा.”

“ हो रे.. तुझ्या बाबांना रव्याचा लाडू आवडतो तर मला बेसनाचा. म्हणून आजी नेहमी दोन्ही लाडू करायची. कायम घरात लाडू चिवड्याचे डबे भरलेले असायचे. ऑफिसमधून घरी आल्यावर काय खावं असा प्रश्न मला कधीच पडायचा नाही तेव्हा..”

“आई, किती छान होते ना ते दिवस. तू आणि आजी मिळून फराळाचा प्रत्येक पदार्थ घरीच करायचात. मी आणि कविता ताई त्यात नुसतीच लुडबुड करायचो. खूप धमाल यायची तेव्हा.”

“ अरे हो.. त्यांच्याकडूनच तर मी हे सगळे फराळाचे पदार्थ शिकले. मला कुठे आधी काही करता यायचं? पण खूप समजून घेतलं त्यांनी मला. काही येत नाही म्हणून कधीच टाकून बोलल्या नाहीत त्या मला.” अनघाही कौस्तुभ बरोबर आठवणीत रमली.

“तायडीच्या वेड्यावाकड्या रांगोळ्यांनाही आपण सगळे छान छान म्हणायचो. बाबा तर तिला फक्त रांगोळीसाठी म्हणून एक ड्रेस जास्त घ्यायचे.”

“ हो रे, तेव्हा रांगोळी म्हणजे एक मोठ्ठा कार्यक्रमच असायचा. गेरु रंगवणं, डिझाईन्स निवडणं, रंग ठरवणं. तो सारवलेला गेरु वाळेपर्यंत पण दम नसायचा तिला. आणि त्यात जरा कोणी जाता येता तिच्या रांगोळीला काही म्हंटलं की झालं.. बाईसाहेब लगेच रडायला बसायच्या. मग तू काढलेली रांगोळी छान आहे हे तिला पटवून देतांना नाकी नऊ यायचे माझ्या.”

“पण आता मात्र ताई रांगोळी एक्सपर्ट झालीये हा. दरवर्षी फोटो येतात ना तिच्या दिवाळीच्या प्रत्येक दिवशीच्या वेगवेगळ्या रांगोळीचे. इतकं भारी वाटतं ना ते पाहिले की. गेली चार वर्ष बाहेर राहून मोबाईल मधल्या रांगोळ्या पाहात आणि पार्सल मधला फराळ खात तर दिवाळी साजरी केलीये मी. आणि यंदा इथे आहे तुमच्या बरोबर तर दिवाळी साजरी करायचा मूडच नाहीये." कौस्तुभ नाराजीने म्हणाला.

त्याचा उतरलेला चेहरा पाहून अनघाला गलबलून आलं. 

इतक्यात फोन वाजला म्हणून हॉलमध्ये गेला आणि अनघाने देव्हार्‍यातल्या देवाकडे बघत ‘ह्याचं नोकरीचे काम लवकर होऊ दे रे देवा’ अशी मनोमन प्रार्थना करत हात जोडले.

कविताचे लग्न झाले आणि त्या पाठोपाठ कौस्तुभ मास्टर्स करायला दोन वर्षांसाठी म्हणून अमेरिकेत गेला. MS पूर्ण झाले आणि तिथेच त्याला चांगली नोकरी लागली. त्यामुळे आधी फक्त शिकण्यासाठी म्हणून गेलेल्या कौस्तुभचे परतणे लांबणीवर पडले.

कविता आणि कौस्तुभ दोघंही लांब गेले आणि अनघा व सुहाससाठी दिवाळीपेक्षा ख्रिसमस जास्त महत्वाचा झाला. कारण अमेरिकेत मोठी सुट्टी फक्त ख्रिसमसला असल्याने कौस्तुभ डिसेंबर मधेच घरी यायचा आणि त्याच्या बरोबर राहायला मिळावे म्हणून कविताही लेकीला घेऊन ख्रिसमसच्या सुट्टीतच माहेरी यायची. 

दिवाळीला दोघंच असल्याने अनघाला दिवाळीसाठी फारसा उत्साह नसायचा. तसे कौस्तुभला पाठवायचे म्हणून फराळाचे पदार्थ करायची ती पण त्यात इतका आनंद नसायचा.

गेल्या वर्षी कोरोनामुळे कौस्तुभच्या कंपनीतल्या बऱ्याच जणांवर घरी बसायची वेळ आली. त्यात कौस्तुभचाही नंबर लागला. तरीही त्याने अजून एक वर्षभर तिथेच राहून दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न केला. 

पण कोरोना काळात बेरोजगारी इतकी वाढली की नवीन नोकरी मिळणं खूप कठीण होऊन बसलं. त्यात ज्या काही थोड्याफार संधी असायच्या तिथे, त्यासाठी इतर देशातून आलेल्या म्हणजे व्हिसावर तिथे राहाणार्‍यांना शेवटचा प्रेफरन्स मिळायचा. 

खूप प्रयत्न करूनही हातात काही आले नाही आणि जमा केलेले सेविंग्जही संपत आल्याने शेवटी कंटाळून कौस्तुभ भारतात घरी परत आला.

आल्यावर कौस्तुभने इथे नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. पण लॉकडाऊनमुळे इथेही काही फारशी वेगळी परीस्थिती नसल्याने नोकरी मिळणे कठीणच जात होते. त्यामुळेच कौस्तुभ खूप अस्वस्थ होता.

अनघासाठी मात्र ही यंदाची दिवाळी खास होती. तिचा लाडका लेक चार वर्षांनंतर दिवाळीला घरात होता आणि नुसता घरात होता असे नाही तर अभ्यास, नोकरी किंवा इतर कुठल्याही व्याप मागे नसल्याने पूर्ण वेळ तिच्यासोबत घालवत होता.

सध्याच्या परिस्थितीमुळे जरासा हळवाही झाला होता. लहानपणी जसा आई आई करत तिच्या मागे असायचा तसंच काहीसं आता परत झालं होतं. 

त्याला वाटणारी काळजी, भविष्याबद्दलची चिंता हे सगळं अनघाला समजत होतं. ती आणि सुहास आपापल्या परीने त्याला वेळोवेळी समजवत होते. धीर देत होते. पण सध्याच्या स्थितीत मन शांत ठेवून जमेल ते प्रयत्न करत राहाणे एवढेचं हातात होते.

अनघा व सुहास दोघांचाही कौस्तुभवर, त्याच्या हुशारीवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे बाहेरची परिस्थिती सुधारली की त्याला नोकरी मिळेल ह्याची खात्री होतीच. 

फक्त ती खात्री प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्यांना कौस्तुभला जपायचे होते. त्याला शक्य तितके आनंदी ठेवायचे होते आणि त्यासाठी दिवाळी सारखी उत्तम संधी नव्हती.

अनघाचा जीव कौस्तुभसाठी तुटतही होता आणि त्याच्या अवतीभवती असण्याने ती सुखावतही होती. आत्ता परिस्थितीमुळे घरात असला तरी लवकरच कौस्तुभ पुन्हा उंच भरारी घेऊन लांब निघून जाईल, तेव्हा आहे तो वेळ त्याच्यासोबत आनंदाने घालवायचा ह्या एकाच विचाराने अनघा दिवाळीची उत्साहाने तयारी करत होती.

दिवाळीच्या निमीत्ताने कौस्तुभ बरोबर केलेली खरेदी तिने आणि सुहासने एंजॉय केली होती.  इतरवेळी दोघंच असतांना त्यांना खरेदीचाही फारसा उत्साह नसायचा. कविता आणि कौस्तुभ आग्रह करायचे म्हणून त्यांच्या समाधानासाठी दोघं खरेदीला जायचे. 

पण यंदाची गोष्ट वेगळी होती. त्यांचा लाडका लेक यंदा दिवाळीला त्यांच्या सोबत होता. 

त्याचा फारसा मूड नसला तरी आईबाबांसाठी त्याने खरेदी, घराची साफसफाई, रोषणाई या सगळ्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे अनघाच्या मनावरच्या नाराजीची मरगळ थोडी का होइना पण कमी झाली होतीच. 

त्यात आज कौस्तुभने तिच्याबरोबर लाडू आणि चकल्या करण्यासाठी दाखवलेल्या तयारीमुळे अनघाचा उत्साह अजूनच वाढला होता.

कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलाच्या मागे ठाम उभी राहाणारी अनघा मधली आई निराशेचा अंधकार दूर करुन चैतन्याचा प्रकाश पसरवणाऱ्या दिवाळीच्या स्वागताला सज्ज झाली होती. 

कारण चार वर्षांनंतर दिवाळीत लाभलेली कौस्तुभची सोबत हीच तिच्यासाठी मनोदीप उजळवणारी खरी दिवाळी होती.

समाप्त

©  धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने