काळजाचा ठोका चुकतो तेव्हा

© वर्षा पाचारणे




प्रत्येक लहान मुलाला जर विचारलं की, "तुझी सगळ्यात आवडती व्यक्ती कोण?" तर ते मुलं क्षणाचाही विलंब न लावता बोलून मोकळं होतं की 'माझी आई'. आई आवडते की बाबा? या प्रश्नावर बाबांकडे बघूनही मुलांच्या तोंडून नकळत का होईना निघून जाते,' आई '. 

कधी काही लागलं, तरी तोंडून पटकन शब्द बाहेर पडतो तो म्हणजे, 'आई'... कितीही ओरडली, तरी तिच्यावर न रागावता मूल पुन्हा थोड्यावेळात तिच्याच जवळ जाऊन बिलगतं. असं हे आईशी जुळलेलं नातं जणू जन्मोजन्मीचं.

हे सांगण्यासाठी आज कारणही तसंच झालं. एक आई आपल्या लेकरासाठी काय म्हणून करत नाही.... आपल्या लेकराला काही दुखलं खुपल की आईचा जीव कासावीस होतो. 
मुलं आजारी असतील तेव्हा रात्र रात्र उश्याशी जागणारीही आईच असते. अश्याच एका आई आणि लेकराची एक हृदयस्पर्शी कथा.

अस्मिता आणि अभय एक नवविवाहित जोडपं. अस्मिता गोरीपान, देखणी, जेमतेम उंचीची तर अभयही तिला अगदी साजेसा असाच होता. 

अभयच्या नोकरीनिमित्त त्यांनी अंबरनाथ मधील स्वतःचा फ्लॅट भाड्याने देऊन पुण्यात स्थायिक झाले.. अभयने वर्षभरातच कर्ज काढून स्वतःचा फ्लॅट घेतला. पगार उत्तम असल्याने कर्जाच्या हफ्त्याचा काही ताण जाणवत नव्हता. त्यात लग्नाला दीड दोन वर्षच झाल्याने इतर काही म्हणावे असे खर्च नव्हते.

सुट्टीच्या दिवशी दोघेही सकाळचा नाश्ता आटोपून कुठेतरी भटकंतीसाठी जायचे..... मग कधी लाँग ड्राईव्ह किंवा कधी मित्रांसोबत ट्रेक.... असं कुठे ना कुठे तरी फिरणं सुरू असायचं. थोडक्यात काय आयुष्य अगदी मजेत सुरू होतं. 

घराला प्रशस्त अशी बाल्कनी होती. संध्याकाळच्या वेळेस दोघंही आराम खुर्चीत बसून शांतपणे चहा आणि गप्पांचा आस्वाद घ्यायचे. 

आता अस्मिताला बाळाची चाहूल लागली होती. घरात वडीलधारी मंडळी नसली तरी तिचे सगळे हट्ट, सगळे डोहाळे अभय अगदी आवडीने पुरवत होता. 

अस्मिताला कधी अबोलीचा गजरा माळायचा असा हट्ट असायचा, तर कधी अभयच्या हातचा अननसाचा शिरा खायचा असायचा..,एक दिवस ती 'अगंबाई .. अरेच्चा ' चित्रपट बघायचा म्हणून आडून बसली.. शेवटी अभयने सीडी आणून तिच्यासोबत घरबसल्या पॉपकॉर्न आणि कॉफी घेत चित्रपटाची मजा अनुभवली.

अस्मिताने बाळाचे नावही ठरवून ठेवले होते.. मुलगा झाला तर प्रेम आणि मुलगी झाली तर प्रिती... अस्मिताला मुलगा झाला... अगदी गोड, गोंडस, सावळा रंग, काळेभोर कुरळे केस, रेखीव भुवया.... त्याच्या चेहऱ्याकडे पाहून अस्मिताचा सारा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. 

अगदी कृष्णाचं मनोहर रूपच भासायचा तो... त्याच्या बाललीला बघताना मातृत्वाचा क्षण अन् क्षण अद्भुत वाटायचा अस्मिताला... त्याची प्रत्येक लहानात लहान गोष्ट ती मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून घेत असे. 

त्याचं पालथं पडणं, त्याचं घरभर रांगणं, कपाटाला धरून हळूहळू उभं राहणं अगदी सारं काही मोबाईलमध्ये बंदिस्त होत होतं. 

आठवणींचे क्षण इतके होते की मोबाईलची गॅलरी फुल्ल झाली होती. अभय त्यावरून तिला गमतीने म्हणायचा देखील," अस्मिता, या सगळ्या फोटोंच्या प्रिंट काढल्या तर अल्बम पुरायचे नाहीत"..त्यावर अस्मिता हसून म्हणायची," राहूदे, प्रेम मोठा झाला की हेच फोटो आठवणी बनून राहतील".

जसा जसा प्रेम मोठा होत होता, त्याचा खोडकरपणा अतिशय वाढत चालला होता.. कधी तो बाल्कनीत उभे राहून खाली वस्तू फेकायचा, तर कधी घरातील वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायचा. त्याला एखादी गोष्ट हवी असली तर रडून अख्ख घर डोक्यावर घ्यायचा. अस्मिताला वाटायचं,' लहान आहे अजून प्रेम, थोडा मोठा झाला की वागेल नीट'.. त्यामुळे ती त्याचे सारे हट्ट पुरवायची.

एक दिवस सकाळी अभय कामावर निघून गेला. प्रेम अगदी गाढ झोपेत होता. अस्मिताला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडायची होती. तिने घरातील बाकीची कामे पटापट करून घेतली. 

चहा करायला ठेवला आणि तिच्या लक्षात आलं की दूध नाहीये. तिने हळूच बेडरूममध्ये डोकावून पाहिलं... प्रेम गाढ झोपेत असल्याचं पाहून तिने हळूच दरवाजा बंद केला.. आणि शेजारच्या इमारतीतील दुकानात दूध आणण्यासाठी गेली. 

रोज आईने हलवून हलवून झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न केला, तरी न उठणारा 'प्रेम', आज नेमकाच जागा झाला. चार साडेचार वर्षांचं लेकरू ते.... घरात आईला शोधू लागलं.. रडवेला होऊन त्याने मुख्य दरवाजा उघडून पाहिले.. आई काही दिसेना. 

शेवटी बाल्कनीत उभे राहून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला... बाल्कनीच्या भिंती पलीकडे काही दिसेना म्हणून हा चिमुरडा तिथल्या झाडाच्या कुंडीवर चढला. बाल्कनीला बंदिस्त ग्रील नसल्याने त्याचा अचानक तोल गेला.

तिसऱ्या मजल्यावरून हे लेकरू धपकन खाली पडलं. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका गृहस्थाला खिडकीतून काहीतरी पडल्याच दिसलं, म्हणून त्याने वाकून खाली पाहिलं.... बघतो तर काय! 

वरती राहणारा चिमुरडा प्रेम पडला होता. त्याने धावत जाऊन प्रेमला उचललं... त्याच्या पाठीवर थोपटत,' बाळा', 'बाळा' म्हणून ओरडू लागला.... तोपर्यंत त्याचा आवाज ऐकून बिल्डिंगमधील इतर मंडळी खाली जमा झाली.

हॉस्पिटलमधे नेण्यासाठी गाडी सुरू करणार तितक्यात अस्मिता आली. प्रेमला असं बेशुद्ध, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहून तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली. तिला कसे बसे सावरुन बसविले. 

"प्रेम....प्रेम" म्हणून तिची आर्त किंकाळी सगळ्या परिसरात ऐकू गेली. 

अभयला देखील कुणीतरी घडला प्रकार फोन करून सांगितलं असल्याने तो तडक घरी आला. 

प्रेमला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं... केस अतिशय गंभीर आहे असं सांगत डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं.

एका अतिशय प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रेमला दाखल करण्यात आलं. ताबडतोब ते इवलंसं शरीर असंख्य नळ्यांनी वेढलं गेलं. ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. एक हसरा खेळकर मुलगा एका क्षणात आयसीयुमध्ये पडला होता. 

हृदयाचे काम चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी मशिन सज्ज झाले.... मशीनवर सरळ लाल रेषा दिसत होती. ICU च्या बाहेर उभ्या असलेल्या अभयने काचेतून ते पाहिले आणि तो समोर उभ्या असलेल्या सोसायटीतील मनुष्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला.

 "काहीही करा, डॉक्टरांना सांगा पण माझा प्रेम वाचला पाहिजे" असं म्हणून तो मटकन खालीच बसला... रमेशने त्याला धीर दिला. 

रमेश मनात म्हणाला," देवा, माझी इतक्या वर्षांची भक्ती थोडी जरी तुझ्यापर्यंत पोहोचली असेल तर तू आत्ताच्या आत्ता प्रेमला जगव" .....

सगळं वातावरण गंभीर झालं होतं. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध जणू फुटला होता. प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होते.... प्रेमची हृदयाची धडधड आता जाणवत होती. 

मेंदूला मार लागला असेल तर अनेक टेस्ट कराव्या लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. 

अभय म्हणाला," डॉक्टर, कितीही पैसे खर्च होऊदे, मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या प्रेमला वाचवा". 

"आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, पण आता आमच्या हातात काहीच नाही, जे काही आहे ते त्या वरच्याच्या हातात"... हे वाक्य आपण नेहेमीच चित्रपटात ऐकतो.. पण तेच वाक्य त्यादिवशी डॉक्टरांच्या तोंडून ऐकताना मात्र पायाखालची जमीनच सरकली. 

पुढचे ४८ तास अतिशय धोक्याचे आहेत असं सांगण्यात आलं.

सगळ्यांना अस्मिता दोषी असल्यासारखे वाटत होते.... मूल झोपलेलं असताना काय गरज होती बाहेर जायची वगैरे वगैरे कुजबुज कानावर येत होती.... पण त्या परिस्थितीत सगळ्यात जास्त दुःखी खरं तर तीच होती, हे कुणी समजूनच घेत नव्हतं.

रोज जो मुलगा स्वतःहून उठत नाही तो आज अचानक असा उठेल आणि त्यातून वरून खाली पडेल असं तिला बिचारीला स्वप्नातही वाटलं नसेल... पण बोलणाऱ्याचे तोंड धरू शकत नाही म्हणतात तेच खरं.... 

बिल्डिंग मध्ये असलेल्या गणपतीला प्रत्येक जण आळवून सांगत होता, " प्रेम बरा होऊ दे" हे एकच मागणं प्रत्येक जण मागत होता.

 गुरुवारची पूजा घरोघरी मांडली होती आणि प्रत्येक महिला 'प्रेम बरा होऊ दे ग आई ', ही इच्छा सांगत होती.

सोसयटीतील सदस्य जणू एका कुटुंबासारखे असल्याने आज जो तो गणपतीला म्हणत होता," जर तू देव असशील तर आम्ही तुझी ताकद आज पाहू,... नाहीतर यापुढे आम्ही केवळ तुला दगड समजू ..... तू विद्येची देवता आहे, मग त्या लेकराला सुखरूप घरी परत आण"..... शेवटी भक्त आणि देवाचं नातं हे वेगळंच असतं... भक्त देवाकडे हट्टाने मागतोही अन् हक्काने त्याच्यावर रागावतो देखील.

एका इवल्याश्या जिवासाठी आज सारी दुनिया प्रार्थना करत होती.

दोन दिवस डोळे न उघडलेला प्रेम आज किंचित डोळे उघडू पाहत होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि लोकांच्या भक्तीला यश आलं होतं.

रडून रडून डोळे सुजलेली अस्मिता दिवस रात्र हॉस्पिटलच्या एका बाकड्यावर जागच्या जागी आखडून बसली होती. सकाळी सकाळी नर्स आली आणि म्हणाली," ताई तुमच्या मुलाला शुद्ध आली आहे," ...अस्मिताचा कानांवर विश्वास बसत नव्हता.

ती धावत आत गेली... प्रेमला आज तिने दोन दिवसांनी पाहिले होते... हेच दोन दिवस दहा वर्षांसारखे तिला वाटले होते. 

तिने आपला हात हळूवार प्रेमच्या गालावर फिरवला.... रडत रडत ती बडबडत होती, "बाळा, आता आई तुला सोडून कधी जाणार नाही, माझं चुकलं, बाळा माझं चुकलं".... नर्सने तिला पुन्हा बाहेर बसायला सांगितलं.... 

तीन चार दिवस नळ्यांमधून दिल्या गेलेल्या अन्नाला प्रेम व्यवस्थित प्रतिसाद देत होता.... मेंदूला कुठलीच दुखापत झाली नव्हती.

पण डावी बाजू पूर्ण फ्रॅक्चर होती.... किमान २-३ महिने तरी प्रेम आता झोपून राहणार होता.... त्यानंतर तो पुन्हा व्यवस्थित आयुष्य जगेल असे डॉक्टरांनी सांगितले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

प्रेमला डिस्चार्ज मिळाला... अस्मिता एक क्षणही त्याला आता नजरेआड होऊ देत नाही.... देवाने प्रेमला एक नवं आयुष्यचं जणू दिलं होतं.... पुनर्जन्मच व्हावा अशी काही घटना घडली होती.

आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडायला एक मिनिटही पुरेसा असतो, पण त्यातून सावरायला अख्खं आयुष्यही कधी कधी कमी पडतं...ही घटना अस्मितेच्या आयुष्यात असा काही धडा देऊन गेली की अस्मिता आजही त्यातन पुरती सावरली नाही.

मातृत्वाचा प्रवास जेवढा आनंददायी तितकाच जबाबदाऱ्यांनी भरलेला असतो हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आलं.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने