दिसतं तसं असतं?? (भाग 1)


© सौ.वैशाली प्रदीप जोशी


 

अमृताची बदली नागपूरला झाली अन् तिला आकाश ठेंगणं झालं.

रोहित एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. गेल्या बावीस वर्षांपासून नोकरीनिमित्याने पुण्याला होता. अमृता त्याची पत्नी. तीदेखील बँकेत नोकरी करत होती. 

अर्णव हा त्यांचा एकुलता एक मुलगा. हैद्राबादला इंजिनीयरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

रोहितला एका प्रोजेक्ट निमित्ताने दोन वर्षांसाठी जर्मनीला जायचा चान्स मिळाला अन् नेमकं त्यावेळेसच अमृताची प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आणि पर्यायाने बदलीही. 

तिनं आवडीनं तिच्या सासरच्या गावी नागपूरला पोस्टींग मागून घेतलं.

तसं नागपूरला त्यांचं घर होतंच. म्हणजे तिच्या सासऱ्यांनी बांधलेलं. सासऱ्यांना जाऊन तीन वर्ष झालीत. आता नागपूरच्या घरी तिच्या सासूबाई, धाकटा दीर अभय, जाऊ अनघा आणि पुतण्या अमेय असे चौघेच.

अभयचे स्वतःचे मेडिकल स्टोअर्स होते. म्हणजे रोहितने,अमृताच्या नवऱ्याने पैश्यांची मदत करत दुकान विकत घेऊन दिले होते आणि भांडवलसुद्धा उभे करून दिले होते. 

शिवाय वरचेवर रोहित-अमृताचे नागपूरला जाणे-येणे असे आणि लागेल तशी मदतही.

नागपूरला पोस्टींग झाल्यावर राहायचं कुठं हा प्रश्नच पडला नाही अमृताला. 

कारण सासऱ्यांनी बांधलेलं दुमजली घर होतं. शिवाय त्याच्या नूतनीकरणासाठी रोहितनी काही रक्कम दिलेली वडलांना त्यावेळी..ह्या हक्कानं तिनं क्वार्टर मिळू शकत असतानाही घरीच राहण्याचा निर्णय घेतला.

"रोहित दोन वर्षांसाठी जर्मनीला जाणार अन् अर्णव हैद्राबादलाच आहे पुढची अडीच वर्ष, मग पुण्याला एकटं राहण्यापेक्षा नागपूरला सर्वांसोबत राहणं कधीही चांगलंच.नाही का?" अमृताचा विचार झाला. 

फेसबुकवर एकत्र कुटुंबाबद्दल कित्ती छान लिहिलेलं असतं ! सासू-सून मायलेकी,अन् जावा-जावा बहिणीसारख्या ! अगदी भरलं घर !! कित्ती कित्ती फायदे आहेत एकत्र कुटुंबाचे ! सगळं वाचून मलाही वाटायला लागलंय एकत्र कुटुंबात राहावंसं! पण लग्नाच्या आधीपासून रोहित घराबाहेर त्यामुळे एकत्र राहताच नाही आलं सासरी!" अमृतानं तिच्या विचारांना बळकटी दिली.

"शिवाय तिघीजणी मिळून घरातली कामं करू, दोन पैसे वाचतील, घरभाडं वाचेल आणि एकमेकांची सोबत होईल हा बोनस" तिच्या नजरेसमोर तिला हल्ली मेनोपॉजमुळे सतत जाणवणारा एकटेपणा होता. आई आणि अनघा सोबत असतील. सगळे सणवार पूजा-अर्चा यथासांग करू ! मला खूप हौसए ! पण इथं एकटीला करायचा कंटाळा येतो. प्रमोशनचं हे पोस्टिंग मस्त एन्जॉय करूयात !! तिचा मनसुबा.

"असं करूया आपण, मी कुठेतरी दीड खोली भाड्यानं घेऊन राहणार किंवा पेइंग गेस्ट म्हणून अड्जस्ट करणार. त्यापेक्षा घरीच राहीन मी.

मी दिवसभर घरी नसणारचंय, मला माडीवरची एक खोली पुरेत.थोडी अडचण होईल पण आपलं घर आहे नं ते ! घरभाड्याचे जे 5000 वाचतील ते आईंना देऊया आपण, आणि घरात माझं खाणं-पिणं, किराणा ह्याचे सातेक हजार भाऊजींना. शिवाय अनघालाही देईन म्हणते तीन हजार 'पॉकेटमनी' म्हणून." अमृता तिच्या आयडियेच्या कल्पनेवर बेहद्द खूष होत रोहितला सांगू लागली.

तिच्या उत्साहाच्या धबधब्याला थांबवणे रोहितच्याही जीवावर आले आणि अमृता नागपूरला जॉईन झाली.

नंतरच्या आठवड्यात रोहित-अमृता आवश्यक सामान घेऊन नागपूरला आले अन् ठरल्याप्रमाणे वरच्या खोलीत तिचं सामान लागलंसुद्धा ! त्यानंतर आठ दिवसांनी रोहित जर्मनीकरिता रवाना झाला.

आता त्या सर्वांचं एक नवीन रुटीन सुरु होणार होतं.

रात्री जेवताना अमृतानं सगळ्यांसमोर विषय मांडला, "मी सकाळी स्वैपाक करून घेत जाईन सगळ्यांचा अन् संध्याकाळचा अनघा करेल." कुणीच काही बोललं नाही पण "मौन हीच संमती" म्हणून अमृताला काही वावगं वाटलं नाही.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमृता सकाळीच उठली अन् अंघोळ करून स्वैपाकाला लागली. अमेयची सकाळची शाळा असायची.त्याचा खाऊचा डबा, सगळ्यांच्या पोळ्या, दोन भाज्या, वरणभात आणि कोशिंबीर, दोन तास निघून गेले त्यातच. सकाळी आई भाजी चिरून देतील अशी तिची अपेक्षा पण त्या देवपूजेच्या तयारीत अन् फुलं-पत्री तोडण्यात व्यग्र." साग्रसंगीत पूजापाठ केल्याशिवाय कश्शाकश्शाला हात लावत नाही मी" हे त्यांचं तत्त्वज्ञान.

"आई, संध्याकाळी येताना दोन-तीन दिवसांची भाजी घेऊन येतील का भाऊजी? सकाळी भाजी घेऊन तिची उस्तवार करून फोडणीला घालेपर्यंत खूप उशीर होतो.मी पुण्याला चार पाच दिवसांची भाजी आणून निवडून ठेवायचे फ्रीजमध्ये.टप्परवेअरमध्ये अगदी ताज्या राहतात"

"नको, नको ! शिळ्या भाजीला चव नाही लागत. दारावर छान येते भाजी सक्काळीच" इति धाकट्या जाऊबाई.

"सक्काळी कुठे साडेआठच्या पुढे आला आज भाजीवाला. त्यात आईंनी 1/2 किलो मेथी घेतली डाळभाजी करूया म्हणून.निवडून कुकरला लावेपर्यंत अर्धा तास गेला.मग कुकरचं प्रेशर जाणार कधी, फोडणी घालणार कधी?? मला शार्प 10 वाजता निघावं लागणार घरातून" अमृता बोलली खरं पण फक्त मनातच.

गेले पंधरा दिवस हाच कार्यक्रम सुरु होता. सकाळी भाजीवाल्याची वाट पाहणे, नंतर पालेभाजी, शेंगा, कोबी अश्या भाज्या घेणे आणि त्या सकाळीच करणे. 

सासूबाई तरी काही मध्यस्थी करतील ह्या आशेनं अमृतानं त्यांना म्हटलंच एकदा "सकाळी फळभाजी घेत जाऊया म्हणजे लवकर होईल भाजी"

"अगं तूच केली पाहिजेस भाजी असं काही नाहीये बरं! अनू करेल तिची कामं झाल्यावर" सासूबाईंनी तोडगा काढला.

"पण माझं जेवण... "

"अगं, लोणचं आहे, तूप-गूळ आहे, साखरांबा आहे, शिवाय कुकर होतो नं सकाळी, वरण पोळी खाऊन जा" सासूबाईंनी निर्णय दिला.

"आणि अगं हो, भात नं नको लावत जाऊस इतक्या सकाळी, अभय दुपारी दोन वाजता येतो दुकानातून, आम्ही तेव्हाच लावत जाऊ गरम-गरम" भाजीसोबत आता ती भातालासुद्धा पारखी झाली होती.

"असू देत.संध्याकाळी खाऊया हवं तसं नि हवं ते !" तिनं मनाचं समाधान करून घेतलं.

एक दिवस अमृता ऑफिसमधून जरा उशिरानं घरी आली.आधीच ऑडिट सुरु त्यात बराचसा स्टाफ सुट्टीवर आणि झालेला हा उशीर.अगदी गळून गेलेली अमृता.

"चंद्रपूरची शोभामावशी आणि तिचा मुलगा आलाय.टेकडीच्या गणपतीला गेलेत दोघंही.येतीलच आता"- घरात शिरताच सासूबाईंनी माहिती पुरवली.

"संध्याकाळचा स्वैपाक अनघा करणारे.पण आज पाहुणे आहेत तर काही मदत करूया स्वैपाकात" असा विचार करत ती फ्रेश व्हायला गेली अन् पंधरा मिनिटांनी खाली आली तर.... स्वैपाकघरात ही शांतता...

आज स्वैपाकाचं काय...हा विचार करत असताना कपाळाला घट्ट पट्टी बांधून अनघा समोर आली.

"काय गं? बरं नाहीये?" अमृतानं विचारलं.

"खूप डोकं दुखतंय हो" अनघा कण्हत होती.

"कशानं पण?"

"आईनं बीपीची गोळी नाही घेतली" अमेयनं माहिती पुरवली.

"घरी काही कार्य असू देत नाहीतर पाहूणे, अनघा हमखास गोळी घ्यायला विसरते (?)" हा धडा तसाही अमृताला नवीन नव्हताच. तिनं उठून अनघाला साखर पाणी करून दिलं अन् स्वैपाकाला लागली.

आता तर हा बरं नसण्याचा कार्यक्रम आठवड्यात तीनदा होऊ लागला होता अन् अश्यावेळी संध्याकाळच्या स्वैपाकाची जबाबदारी आपसूक अमृतावर येऊन पडे. 

मात्र मी इथं नसताना आणि इतकी खराब तब्येत असताना ही कसं काय निभावते हा प्रश्न तिला पडू नये असं वाटत असतानाही पडू लागला होता.

एरव्ही बरं नसलं की आई खिचडी करते असं तिला निरागस अमेयनी सांगितलं. 

पण सासूबाईंचा पोळ्यांचा आग्रह मात्र कायम असे. "अगदी थोडुश्श्या पोळ्या कर " ह्या त्यांच्या शब्दाचीही तिला चीड येऊ लागली. "कणिक भिजवायचीच तर थोड्या काय अन् फार काय" असं म्हणत मग बरेचदा रात्रीसुद्धा अमृताच्या हातचा चारी-ठाव स्वैपाक सुरु झाला.

एकदा अमृताच्या ऑफिसमध्ये एक माणूस साड्या विकायला घेऊन आला. 

अमृतानं त्यातली एक दोन हजाराची साडी स्वतःसाठी घेतली अन् एकटीसाठी घेणं बरं नाही दिसणार म्हणून अनघासाठीपण एक घेतली..पण स्वतःपेक्षा कमी किमतीची..आठशे रुपयांची.

धाकट्या जाऊबाई साडी बघून खूश होणार ह्या विचारात तिनं घरी आल्यावर दोन्ही साड्या दाखवल्या आणि प्रतिक्रियेसाठी दोघींकडे बघितलं.

अनघानं साडी उलगडून किमतीची लेबलं बघितली अन् जास्त किमतीची साडी मांडीवर घेऊन बसली.

अमृतानं ती साडी माझ्यासाठी घेतलीये असं सांगण्याचा क्षीण प्रयत्न केला पण सासूबाईंनी "दोघीना कसं सारखं घ्यायला हवं" चा रेटा लावला.

"मी दोघी सुनांना कसं सगळं सारखं घेते आणि तीच पद्धत कशी योग्य आहे" ह्या त्यांच्या युक्तिवादाचं अमृताला हसूच आलं !

"अहो आई, तुम्ही दोघी सुनांना सारखं घेता पण इथे मी माझ्या जावेला माझ्याइतकं घेणं गरजेचं नाहीये. हा नात्यांमधला फरक ओळखा जरा" असं अमृता मनात असूनही बोलली नाहीच कारण सासूबाई तेच आणि तेव्हढंच ऐकतात जेव्हढं त्यांना ऐकायचं असतं हे तिला एव्हाना कळून चुकलेलं !

ह्या सगळ्यात स्वतःसाठी म्हणून आणलेली साडी स्वतःकडे ठेवण्यात अमृता यशस्वी झाली खरी पण सासूबाई आणि अनघाची नाराजी पत्करून !

आपण कौतुकानं काही करायला जावं पण अपेक्षांच्या ढीगापुढं ते थिटंच पडणार ह्याची कल्पना अमृताला अश्या प्रसंगांतून येऊ लागली होती !

आताशा रोज सकाळी भाजी करायला आणि खायला मिळावी म्हणून अमृता संध्याकाळी घरी येताना भाजी अन् सोबतच फळं घेऊन येऊ लागली होती. 

"वास्तविक मी पुरेसे पैसे स्वाधीन करतेय भाऊजींच्या त्यावर आता हा भाजीचा खर्च !" "दोन-तीनदा तर सिलेंडर आलं अन् भाऊजी घरी नाही म्हणून मीच काढून दिले पैसे पण आईंनी तो हिशेब सांगितला नाही भाऊजींना.
त्यांनी त्याचे पैसे परत नाही केले." 

अनघा रोज सकाळी अमेयला शाळेत सोडायला माझी गाडी घेऊन जाते पण पेट्रोल मात्र भरत नाही कधीच" "एकदा लाईटबिल माझ्याच अकाउंटमधून ऑनलाईन भरलेलं लास्ट डेट आली होती म्हणून".अमृताचं विचारचक्र सुरु झालं पण दुसऱ्याच क्षणी "असू देत ! एका ताटात जेवायचं तर घास मोजू नयेत !" तिच्या मनानं तिला फटकारलं.

एकदा अमृता लवकर घरी आली तर जाऊबाई शेजारणीशी गप्पा मारत होती.गप्पांचा विषय अर्थात तीच होती. 

"त्यांचं काय ब्बा, त्या नोकरी करतात ! सकाळी सगळ्यांच्या आधी जेवूनखाऊन पर्स हलवत ऑफिसमध्ये गेलं की ह्यांना आराम दिवसभर ! माझा मात्र नंतरचं सगळं निस्तरताना अगदी पिट्ट्या पडतो!" अनघा शेजारणीजवळ तक्रार करताना नेमकं अमृतानं ऐकलं अन् तिच्या डोक्यात तीव्र सणक उठली !

त्यादिवशी रोहितशी फोनवर बोलताना हताश झाली होती अमृता ! कुठून ह्या एकत्र कुटुंबाच्या फंदात पडलो असं झालेलं तिला. पण करणार काय? एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय तिनं स्वतः घेतला होता नं !



क्रमशः


© सौ.वैशाली प्रदीप जोशी

सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.


धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने