गोष्ट.... तुमच्या माझ्या घरातली !

© वैशाली जोशी






"हॅलो, हं बोल मिलिंद! अरे व्वा!! छान!!! हो, हो! आम्ही येतोय रविवारी... तेव्हा बोलूच सविस्तर" नितीन त्याच्या भावाशी मोबाईलवर बोलत होता अन् भाजी चिरता चिरता मंजिरीचं सगळं लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच होतं.

"ठरलं का साकेतचं लग्न?" तिनं फोन ठेवताच अधीरतेनं नितीनकडे बघितलं.

"सगळं ठरलं नाही अजून... पण मुलगी पसंत आहे साकेतला आणि त्याच्या आईबाबांनापण! सगळं जुळून येतंय तर आपल्याला बोलावलंय निर्णय घेण्याआधी "

"आपल्याला नव्हे तुम्हाला बोलावलं असेल" मंजिरी फणकाऱ्यानं म्हणाली.

"एव्हढा मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला पण माझी आठवण नाही आली तिला!" मंजिरी रागात असली म्हणजे जावेचा -नंदिनीचा उल्लेख "ती" असा परक्यासारखा करते हे नितीनला माहित झालेलं.


असो. पण साकेतचं लग्न finally ठरलं! त्याची भावी वधू केतकी पाहताक्षणीच मंजिरीला आवडली. लग्नाची बोलणी झाली... व्यवहार ठरला....साक्षगंध झालं.... लग्नाची तारीखही काढली.


ह्या सगळ्यात मंजिरीचं विचारचक्रही वेगानं फिरत होतं!


"ह्यावेळेस माझ्याकडून कामाची काही अपेक्षाच करू नका ना! मोठं-मोठं म्हणायचं आणि कपाळी गोटा हाणायचा... नेहमी ह्यांचं सगळं करा, जबाबदारी घ्या आणि पदरी काय पडतं तर फक्त अपयश!


मी काम करते ते दिसत नाही कुणाला पण एक शब्द अधिकउणा बोलले तर गहजब होतो सगळीकडे!


साकेतच्या मौन्जीच्या वेळी देखील तेच झालं. माझ्या अनुयाची परीक्षा होती तरी तिला मामाकडे ठेवून गेले होतेच ना मी चार दिवस आधी तयारीला! पण आमच्या जाऊबाईंना कदर हवी ना! 

आधीतर मारे वहिनी-वहिनी करत मागे फिरत होती. दर दोन दिवसांनी फोन काय... लाडीगोडीनं बोलणं काय... कार्यक्रम पार पडल्याचा अवकाश की आली गाडी पुन्हा रुळावर! 

मी आहेराची पाकिटं उघडत होते तर हिसकावून घेतली माझ्याकडून!! गरज सरो अन् वैद्य मरो!!!"


कारमधून परत येताना मंजिरीचा त्रागा सुरूच होता अन् नितीन शांतपणे ऐकत होता.... त्याशिवाय त्याच्या हातात दुसरं होतं काय म्हणा!


खरं तर मंजिरी म्हणते त्यात चूक काहीच नव्हतं. नंदिनी घरात धाकटी सून बनून आली तेव्हा आईवडिलांचं कुटुंब पूर्ण झालं म्हणून आनंदित होते सगळेच. मंजिरी देखील खूप खूष होती.... धाकटी जाऊ येणार म्हणून.

तसंही घरात हे दोघं भाऊ आणि मंजिरीलाही एक बहीण... त्यामुळे जाऊ / वहिनी /काकू /मामी अश्या नात्यांची तिला फार ओढ होती. 

त्यात मिलिंदची सासुरवाडी आपल्याच गावात आहे म्हटल्यावर मंजिरीला स्वर्ग दोन बोटं उरला होता. आपलं असं कुणीतरी येणार... आपल्या घरी हक्काने राहणार...

"लो चली मै... अपनी देवर की बारात ले के " म्हणत अक्षरशः हरखली होती....काय काय स्वप्न रंगवली होती तिनं!

पण नंदिनीकडून तिला हवा तसा प्रतिसाद मिळालाच नाही.

नंदिनीला सासरपेक्षा माहेरची ओढ जास्त... जास्त म्हणजे जरा अतीच! त्यामुळे तिनं कधी आपल्याबद्दल खासकरून मंजिरीबद्दल आपुलकी ठेवलीच नाही.

त्यात मंजिरी तिच्यापेक्षा जास्त शिकलेली, हुशार आणि नोकरी करणारी त्यामुळे नंदिनीला आपल्या मोठ्या जावेबद्दल जरा जास्तच असुया आहे हे जाणवतंच... सगळ्यांनाच.... अगदी आईबाबांनाही!


"तुमच्या आईबाबांनी माझ्यावर इतकी बंधनं लादली...आणि "हिला" मोकाट सोडलं.... सगळ्या इच्छा, अपेक्षा फक्त तुमच्याकडून आणि माझ्याकडून... "श्रावणबाळ" ना तुम्ही...त्यामुळे मग आम्ही हुकमाचे ताबेदार ह्यांच्या! आधी सासूसासऱ्यांचं ऐकलं आता "ह्यांची" ताबेदारी करा!" मंजिरीच्या तोंडाचा पट्टा थांबण्याचं नावच घेईना.


आपल्या अनुयाच्या लग्नात हे लोकं अगदी वेळेवर आले... बरं ते जाऊ देत पण बाईसाहेब नुसतं मिरवत होत्या मांडवभर.... एका कामाला हात लावला नाही...मुलाची आई ना ती.... आम्हाला मुलगा नाही त्यामुळे तसंही बाईसाहेबांचं नाक वर असतं कायम... नुसते सेल्फी काढले आपल्याकडच्या लग्नात... आपण कपडे किती भारीतले घेतले त्यांना सगळ्यांना!

आता साकेतच्या लग्नात अशीतशी साडी घ्याच म्हणावं मला मी पण बघते... आमच्याकडून दीड हजाराचा आहेर आणि स्वतः सहाशेच्या साडीवर तोंडाला पानं पुसणार...!!! हं.... "

ह्या बायका कित्ती विचार करतात.... बापरे! मिलिंदला सांगायला लागणार वहिनीला तिच्या पसंतीने साडी घे म्हणून" नितीन विचार करत होता.


"सासूबाई गेल्या तेव्हा पंधरा दिवस तिथे राहून सगळं जबाबदारीनं पार पाडलं ना मी! पाडलं ना? घरातला मोठा मुलगा म्हणून सगळा आर्थिक भार तुम्ही स्वीकारलात... तुमचं कर्तव्य पार पाडलं! मी पण साथ दिली ना तुम्हाला! काय हो?" मंजिरीनं प्रश्नार्थक नजरेनं नितीनकडे बघितलं.


"अगं तुझी साथ आहे म्हणून तर सगळं करू शकतो ना मी... नाहीतर नुसत्या पैश्यानं काय होत होतं!" नितीननं तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकत गाडीचा गियर बदलला.


"हो ना! मग आईंचे पंधरा दिवस करून निघताना नंदिनीनं चार किलो तेल आणून मागितलं मला.... एरव्ही मी दिलंही असतं पण आईंच्या दिवसकार्यात आमचं घरचं तेल खर्च झालं ते भरून द्या म्हणाली... आता सासुसासरे काय माझे एकटीचे आहेत का? की आईवडील तुमचेच आहेत फक्त! त्यांचे कुणीच लागत नाहीत का!" मंजिरी आता अगदी रडवेली झाली.


"अगं पण चार किलो तेलाचे असे किती पैसे होतात... आणि मी माझ्या आईवडिलांसाठी केलं तर तुला काय त्रास आहे "नितीनने आरडाओरडा करून नेहमीप्रमाणे तिचं म्हणणं दाबून टाकायचा प्रयत्न केला.

पण परिणाम झाला तो उलटच! मंजिरीनं ह्या कार्यात पूर्ण असहकार पुकारण्याचा निर्णय घेतला...."नेहमी मीच चुकते काय! जो करतो तोच चुकतो ना! आता काही करणारच नाही म्हणजे चुकायचा प्रश्नच नाही!" मंजिरीनं निर्वाणीचं सांगितलं.


"ठीक आहे.... तुला त्रास होत असेल तर काही करू नकोस... पण कटकटही करू नकोस " नितीनही हट्टाला पेटला...


"तसंही आमच्या जाऊबाईंना तुमचंच कौतुक जास्त! नुसती भाऊजी भाऊजी करत नाचत असते.... आता कर म्हणावं भाऊजी-भाऊजी! तुझे भाऊजी स्वैपाक करतात की पंगती वाढतात ते बघतेच आता! तेव्हढ्यातही मंजिरीनं जावेवर तोंडसुख घेतलंच.


तर एव्हढ्या रामायणावरून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच की नितीन आणि मिलिंद हे दोघं भाऊ आणि मंजिरी आणि नंदिनी ह्या दोघी जावा.... मंजिरी ला एक मुलगी अनुया आणि नंदिनीचा मुलगा साकेत.

मिलिंद -नंदिनी आईवडिलांसोबत गावी राहतात आणि नितीन -मंजिरी त्यांच्या नोकरीच्या गावी...

आणि अर्थातच दोघी जावांमधून विस्तव जात नाही!!!!

जावा जावा उभा दावा म्हणतात ते ह्यांना बघूनच की काय असा प्रश्न ह्यांच्या नवऱ्यांना नेहमी पडतो... पण ह्या दोघींच्या वादात आपल्यामध्ये वितुष्ट येऊ द्यायचं नाही हे दोघा भावांनी पक्क ठरवलं त्यामुळे हे घर आईवडिलांच्या मृत्यूनंतरही एकत्र आहे.

इकडे तीस वर्षांच्या संसारानंतर, संसारात पूर्णपणे समर्पण केलेल्या मंजिरीला नितीनचं तिरकस बोलणं नेहमीच दुखावून जातं .. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणत नेहमीच तिनं मनाचा मोठेपणा दाखवत आपली असलेली आणि नसलेली कर्तव्य हसतमुखानं पार पाडली. 

आता मात्र वयोमानाप्रमाणे हा ताण सहन होईनासा झाला अन् मंजिरीने ह्या कार्यक्रमातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला.


"हॅलो, वहिनी.... नंदिनी बोलतेय...." अपेक्षेप्रमाणे पुढच्याच आठवड्यात नंदिनीचा फोन आलाच.


"मी म्हटलं... तुमच्या बाईकडून लग्नासाठी लागणारे मुगवड्या, पापड, कुरडया करून घ्या ना! आणि अनुयाला सांगा... केतकीसाठी साड्या घेतल्यात तर त्याच्या काय ऍक्सेसरीज असतात ते घ्यायला... तुम्हाला मुलगी आहे तर तुम्हाला सगळं माहितेय बाई... मला नाही अनुभव हो...!

आणि तुमची मैत्रिण मेंदी आणि मेकअप करते तिला घेऊन या ना दोन दिवस आधीपासून... म्हणजे माझा मेकअप आणि हेअरस्टाईल करायला... आणि लग्नाचा किराणा घ्यायचाय आणि वरातीची तयारी वगैरे.... शिवाय कुळाचाराचा स्वैपाक सोवळ्यात घरीच करायचाय.... 

माझी आज्जी आणि आपल्याकडचे काही लोक बाहेरचं खात नाहीत हे माहितेय नं तुम्हाला....आठ दिवस आधीच या हं तुम्ही...खूप कामं आहेत....आत्ताच सांगून ठेवते.... 

नाहीतर म्हणाल ऑफिसमधून सुट्टी नाही मिळाली म्हणून... हॅ... हॅ... हॅ.. हॅ.... " छदमी हसत मंजिरीला बोलायची संधी न देता एका दमात आपलं म्हणणं संपवलं!

नेहमीप्रमाणे आपली भोळी मोठी जाऊ कार्यप्रसंगी धावत येणार आणि प्रसंगी पदरमोड करूनही आपलं कार्य साजरं करून देणार ह्याची सवय झालेली नंदिनीला.

"अं... हो... ऐक ना..." मंजिरीचा निर्धार पक्का होता... "अगं ते वाळवण कुरडया, पापड वगैरे रेडिमेड मिळतं ना आजकाल ते ऑर्डर देऊन बोलवून घे... आणि तुमच्याकडे पण पार्लर आहेत की... तिथेच सांग की तुझ्या मेकअपचं... आणि हो, माझा आणि अनुयाचा पण मेकअप सांग तिला... मी देईन आमचे पैसे...

आणि हो, माझी तब्येत बरी नसते आजकाल, तर कुळाचाराच्या स्वैपाकाला बाई लाव... माझ्याकडून स्वैपाक, वाढणं सगळं नाही होणार, आणि कुळाचाराच्या दिवशी सकाळी येईन मी, ऑफिसमध्ये ऑडिट सुरु आहे... सुट्टी नाही मिळणार " मंजिरीनं सांगितलं तसं नंदिनीनं नाराजीनं फोन ठेवला.

रात्री जेवण झाल्यावर मंजिरीनं नितिनला ह्या संभाषणाबद्दल सांगितलं.... "बरं केलंस" एव्हढे दोन शब्द बोलून तो कूस पालटून झोपी गेला.

लग्नाचा दिवस जवळजवळ येऊ लागला तसा मंजिरीचा निर्धार अधिकाधिक पक्का होत होता.

जगरितीला धरून मंजिरीनं साकेतला केळवण करण्याचा घाट घातला. साकेतनं त्यासाठी मुद्दाम एक दिवस सुट्टी घेतलेली.

मंजिरीकाकूनं केळवणाचा जंगी बेत केला.... आमरस, पुरणपोळी,अळूवडी,कढी, कुरड्या अन् काय काय!!

तसं साकेत तिचा लाडका पुतण्या.... पण नंदिनीनं सुरवातीपासूनच मंजिरीच्या जवळ नाहीच येऊ दिलं त्याला.... खरं खोटं काय सांगितलं ते देव जाणे पण तोदेखील काकूपासून दोन हात लांबच राही!

आणि अनुयाला पण नंदिनीनं कधी जीव लावला नाही...उलट साकेतच्या जन्मावेळी "आता तुझे लाड बंद, आता फक्त माझ्या बाळाचे लाड होणार" असं सांगितलं अन् ती चार वर्षांची चिमुरडी अगदी कोमेजून गेली... तेव्हा तिची समजूत घालताना नितीन -मंजिरीची पुरेवाट झालेली.

केळवणाचा कार्यक्रम झाला... जेवणं आटोपली... थकलेल्या मंजिरीनं आतल्या खोलीत जरा अंग टाकलं अन् तिचा डोळा लागला.... जरा वेळानं तिला जाग आली ती नितीनच्या आवाजाने....

नितीन मिलिंद आणि नंदिनीला काही समजावून सांगत होता... साहजिकच मंजिरीनं कान टवकारले...

"ती घरात आली तेव्हा आईबाबांचे स्वभाव फार कडक होते.. आम्ही वेगळं राहिलो नोकरीनिमित्ताने पण तिनं खूप केलंय आमच्या सगळ्यांसाठी.

बाबांचं पायाचं ऑपरेशन करायचं ठरलं तेव्हा स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या तिनं.. कुठल्याही अपेक्षेशिवाय.

साकेतची ऍडमिशन अडली होती तेव्हा स्वतःहून प्रॉव्हिडंट फंडाचं लोन काढून डोनेशन भरायची तयारी होती तिची.... त्याची ऍडमिशन अडू नये म्हणून.

कुठलंही कार्य असो, प्रसंग असो... तिच्या सहकार्याशिवाय आजवर झाला नाही... खूप सोसलंय तिनं... रागात बोलते एखादवेळा.... पण मुद्दा चुकीचा नसतो तिचा... ती आहे म्हणून हे घर आहे... आपण एकत्र आहोत..."

मंजिरी ताडकन उठून बसली... तिच्या लक्षात आलं की नितीन हे सगळं तिच्याविषयी बोलतोय.... तिचे डोळे पाणावले.... समोर कितीही बेफिकीरी दाखवत असला तरी त्याला आपली कदर आहे ह्या जाणीवेनं सुखावली.

नितीनला चाहूल लागताच त्यानं मंजिरीला हाक मारली... आपल्या भावना दिसायला नकोत म्हणून त्याला टाळत ती तशीच वाळत घातलेले कपडे आणायला म्हणून गच्चीवर गेली....साकेत फोनवर बोलत होता.... बहुधा त्याच्या वाग्दत्त वधूशीच... केतकीशी.... तिचे पाय थबकले.

"इतका मस्त स्वैपाक केला होता काकूनं.... त्या खूप सुगरण आहेत आणि हुशारदेखील सगळ्याच बाबतीत.... ऑफिसमध्ये मोठ्या पदावर आहेत पण कश्शाचा गर्व नाही...

हं... आईचं आणि काकूचं पटत नाही फारसं....दोघींमधलं कोण चूक आणि कोण बरोबर ते मी नाही सांगू शकणार... मला वाटतं की आई किंवा काकू जर तुला एकमेकींविषयी काही सांगतील तरी तू मनात पूर्वग्रह ठेवू नकोस.

नव्यानं नातं जोडूया आपण काका-काकूंशी...मला मनातून काकूबद्दल खूप प्रेम वाटतं... तिच्याशी खूप बोलावंसं वाटतं..... पण माहित नाही मी नाही बोलू शकत..... पण माझी पत्नी असावी तर अगदी अशीच असावी असं वाटतं मला..... अगदी माझ्या मोठ्या आईसारखी!"

आता मात्र मंजिरीच्या अश्रुंचा बांध फुटला... "नितीनला , साकेतला माझ्याबद्दल किती प्रेम आहे...पण मी मात्र क्षुल्लक गोष्टींचा इश्यू करून माझ्या लेकाच्या लग्नाचा आनंद गमावतेय....नंदिनीबद्दल म्हणावं तर तिच्यासाठी कितीही केलं तरी तिला माझ्याबद्दल आपलेपणा कधी वाटलाच नाही... आणि तिला माझ्या स्वभावाचा गैरफायदा नाहीच घेऊ देणार मी...पण तिच्या एकटीसाठी ही सगळी प्रेमाची माणसं का गमावू मी?

ह्या सगळ्यांचं प्रेम हीच तर माझ्या कष्टाची परतफेड आहे!ह्यासाठी तर हा सगळा अट्टाहास आहे माझा! मी सगळ्यांसाठी करते ते फक्त मला थोडासा मान, थोडंसं प्रेम मिळावं म्हणून.

हे प्रेमाचं ऋण फेडू म्हटलं तरी फेडता यायचं नाही!" तिचा लग्नातील असहकाराचा निर्धार अश्रुंमध्ये विरघळून गेला.

तशीच वाळलेले कपडे घेऊन ती खाली आली... चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबकारे मारून चेहऱ्यासारखंच तिचं मनही शांत केलं.... नॅपकिनने चेहरा पुसत स्वैपाकघरात आली.

नंदिनीनं दुपारच्या चहाचं आधण ठेवलं होतं... तिनं कपाटातून डायरी आणि पेन काढलं आणि तिथेच डायनिंग टेबलवर बसून लग्नाच्या तयारीची यादी करायला घेतली!

समाप्त

© वैशाली जोशी

सदर कथा लेखिका 
वैशाली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने