पाठवणी

© अनुजा धारिया शेठ




"अहो आई, तुम्ही चक्क पाठवणी केल्यासारख्या रडत आहात.". चेतन आपल्या सासूबाईंना म्हणाला..


"अहो, जावई बापू लेक बाळाला घेऊन आली.. आल्या सारखी २-३ महिने राहिली.. आता हा सूना कोपरा बघून दिवस कसा घालवायचा या विचारानेच रडायला येतंय बघा.."

"ए कम ऑन आई.. अग मी काय पहिल्यांदा सासरी जाते आहे का?" स्वराली आपल्या आईला म्हणाली..

"अग तस नाही ग.. आता तू पण आई झालीस कळेल तुला". स्मिता ताई म्हणाल्या..

बाहेरून सुरेशराव ऐकत होते सार काही.. त्यांनी आत मध्ये शिरत बाळाला घेऊन बारसे विषयी बोलायला सुरुवात केली.. आणि वातावरण बदलले..

चला दोन दिवसावर बारसे आल आहे.. तयारीला लागा..

तशा स्मिता ताई लगबगीनं उठल्या.

लिस्ट घेउन आल्या.. जावयांना मान - पानाच्या साड्या दाखवल्या.. सर्वांना नातीची आठवण म्हणुन द्यायला आणलेली समई दाखवली.

माझी नात ह्या समई प्रमाणे शांत तेवत दोन्ही घराचं नाव उज्वल करेल बघा.. अस म्हणताच.. स्वराली ओरडली,

"ए काय ग आई.. अजून माझी चिऊ दोन महिन्यांची नाही झाली तर तू कुठे जाऊन पोहचलीस.".

"अग चिडतेस काय स्वरू.. मी सहज बोलले ग.". स्मिता ताई म्हणाल्या..

"बघा ह जावई बापू.. वाटल ना वाईट पाठवणी होणार म्हटल्यावर"..

"चला चला पुढ्यात वाढलंय ते पहा आधी..". सुरेश राव..

परत सर्वांनी गिफ्ट पॅकिंग ची तयारी सुरू केली.

स्मिता ताईंनी लेकीची पाठवणी परत एकदा करायची म्हणुन जाताना डिंक लाडू, सालम पाक, बाळासाठी गुटी.. काही घरगुती औषध.. अशी तयारी केली.

शतावरी कल्प.. कुळीथ पीठ असे एक एक करत सामानाची बांधा बांध चालू केली.

उद्या पाहुणे आल्यावर ह्यातल काही जमणार नाही, असे स्वतः शीच बोलत बोलत सर्व तयारी केली..

एकीकडे बारसे साठी हॉल वर लागणाऱ्या वस्तू.. त्याची तयारी सगळ कसं जातीने करत होत्या...

आपल्या आईचा हा उत्साह बघून स्वराली चेतनला म्हणाली, "किती उत्साह आहे बघ ह्या वयातही.. मला तर कौतुक वाटत हीच.. नाहीतर आपण खरच किती नाजूक असा विचार मनात येतो.. आणि guilt वाटत राहत.

प्रत्येक गोष्ट किती मनापासून करते आई.. सगळ्याची हौस आहे.. थोड्या वेळा पूर्वी आम्ही जाणार म्हणुन रडत होती नी आत्ता बघ."

तेवढ्यात सुरेश राव तिथे आले आणि म्हणाले, "तूझी ही पाठवणी करताना उत्साह आहे.. कारण आता तुम्ही आई- बाबा या नात्यात बांधले गेला आहात.

पण मागच्या वेळेस तू घरी आलीस तेव्हा तूझी पाठवणी केल्यावर सर्व नीट होई पर्यंत ती नीट झोपत पण नव्हती ग... मुलीची पाठवणी म्हटल्यावर आई बाबांना भरून येतच ग.

त्यात आम्हाला तुम्ही दोन मुली तूझ्या ताईची अशी पाठवणी करावी लागेल असे स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते ग.. प्रत्येक पाठवणी ही वेगळी ग."


"बाबा.. नको तो विषय.. झालं ते झालं.. ताईच म्हणाल तर नियती पुढे आपले काय हो?

आमच्या बाबतीत म्हणाल तर तेव्हा खरच आमची चूक झाली.. आमचा मूर्खपणा होता तो.".. स्वरू म्हणाली..

चेतन सुध्दा म्हणाला," हो बाबा आमचं खरच चुकल.. आम्हाला माफ करा"

"अहो जावई काय करताय? तुम्ही कसली माफी मागताय.??

तुम्हाला सांगतो आज काल पाठवणी ही मुलीचीच राहिली नाही हो.. मुलांना सुध्दा शिक्षण, नोकरी या साठी बाहेर गावी ठेवताना त्यांच्या आई बाबांची अवस्था ही मुलीची पाठवणी करताना होतें तशीच होते हो."

मोठी सोनाली, आणि ही स्वराली. ह्यांच्या बाबतीत तर प्रत्येक पाठवणीला आम्ही हळवे होत आलो.. मग ती पाठवणी शिक्षण किंवा नोकरी साठी असली तरी.

सोनाली लग्न होऊन जाणार, परदेशात राहणार म्हणुन आम्ही किती खुश होतो.

तुझी आई फार विचार करायची की, पोर एवढ्या लांब जाणार म्हणुन रडायची.

तिची पाठवणी, तिच्या लग्नाची तयारी आम्ही खूप हौशीने केली.. पण त्याच्या मनात काही वेगळच होते बघा.. आम्हाला स्वप्नात सुध्दा वाटल नव्हत की, आम्ही तिला परत कधीच पाहू शकणार नाही त्यामुळे आता पाठवणी हा शब्द वापरला तरी काटा येतो बघा.

सगळ काही छान चालू होत बघा.. सोनाली खुश होती. पण जावई.. तिकडेच मोठे झालेले, त्यांच्या राहण्याच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या.. खटके उडू लागले, ती रागात इकडे यायला निघाली. 

निघतानाच तिने केलेला शेवटचा फोन.. आणि तिचे ते शेवटचं वाक्य.. बाबा एवढ्या लांब का पाठवणी केलीत माझी.. नंतर कसलासा आवाज.. आणि ती गेल्याची बातमी.

नको त्या आठवणी". बोलता बोलता सुरेश राव रडू लागले..

"बाबा पाणी घ्या.. शांत व्हा.." चेतनचे डोळे पाणावले..

आजवर हे सर्व त्याने स्वराली कडून ऐकले होते.. पण बाबांना आज असे पाहून त्याला भरून आले..

लग्नाच्या सहा महिन्यांत त्याचे अन् स्वरालीचे झालेले भांडणं.. तीच घर सोडून येणे.. परत त्यांनी एकत्र यावं म्हणुन आई बाबांनी केलेले प्रयत्न..

आणि आता थोड्यावेळापूर्वी.. जबाबदारीने वागा अस सांगताना कातर झालेला बाबांचा आवाज.. सारे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून गेले.. 

अन् पाठवणी ह्या एकाच शब्दात आई- बाबांच्या दडलेल्या अनेक चांगल्या- वाईट आठवणी यांची जाणिव त्याला झाली..

सुरेशराव पाणी पिऊन शांत झाले तरी हुंदका येत होता.. त्यांना अस पाहून स्मिता ताई घाबरल्या.. "काय झालं यांना.. स्वरू... सांग.."

स्वराली आणि चेतन दोघांनी मिळून त्या दोघांना शांत बसवले.. आणि दोघांनी परत एकदा माफी मागितली..

"आई- बाबा आम्हाला माफ करा.. आम्ही त्या वेळेस खरच मूर्खपणा केला.. लग्न म्हणजे काही खेळ नाही.. पण आम्हाला हे आता कळतंय.. 

तेव्हाच वागणं तुम्हाला किती त्रास दायक झालं ते.. आम्हाला कळलच नाही, लग्न झाल्यावर सर्व मेड फॉर एच अदर नसतात तर हळू हळु आपण या नात्यात मुरत जातो..

आता आठवलं तरी हसायला येते किती फालतू कारण काढून भांडायचो आम्ही.. त्यामुळे मागच्या वेळेस तूम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि स्वरूची परत एकदा पाठवणी केलीत.

तरी तूम्ही काळजीत होतात.. तुमची काळजी समजते मला.." चेतन अगदी जीव ओतून बोलत होता, माफी मागत होता.

"हो आई, परत अस कधीच वागणार नाही ज्याने तुम्हा दोघांना त्रास होइल.". स्वराली म्हणाली..

स्मिता ताई म्हणाल्या, "झालं ते झालं.. चला उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करूया.. जुन उगाळून त्रास नका करून घेऊ.

उद्या तूझ्या सासूबाई येतील.. घरातलं वातावरण छान ठेवा.".

"सार काही नीट होइल.. काळजी नसावी," बाबा म्हणाले..

सर्वांच्या मनातला कोपरा बोलून मोकळा झाल्याने सर्वांना हलकं वाटत होते..

पाहुणे आले घर भरले, वातावरण हसत खेळत झालं.. बारसे कार्यक्रम अगदी छान पार पडला.. बाळाचे नाव श्रीशा ठेवले.

आणि परत एकदा लेकीची पाठवणी करण्याची वेळ आली पण ही पाठवणी मात्र हसत खेळत झाली मनावर कोणतेही ओझे नसल्यामुळे दडपण, शंका- कुशंका, कसे होइल अशी कोणतीच काळजी नव्हती.

तरीही घर सूनं होणार.. बाळाचा दुरावा येणार म्हणुन स्मिता ताईंचे डोळे पाणावले.. अन् मन मात्र हसत गाणे गाऊ लागले...

दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे

जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा

रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा

वळवून अक्षरांना केले तुला शहाणे

जातो सुखावुनि मी या गोड आठवाने

बोलात बोबडीच्या संगीत जागविले

लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले

एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे

हा देह दूर जाता मन राहणार मागे

धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे परक्यापरी आता मी येथे फिरुन येणे..

प्रत्येक मुलीच्या आईच्या मनात तिची पाठवणी करताना हेच भाव असतात नाही, मग ती लग्न झाल्यावर असो, शिक्षणा साठी असो, बाळंत पण झाल्यावर असो.. पण आपल्या मुलीच्या पाठवणीचे दुःख आई बाबांना होतेच.

आणि नियतीने आघात केला आणि मुलीची अशी पाठवणी करावी लागली तर मात्र ते आतून तुटून जातात.


© अनुजा धारिया शेठ

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने