ही अनोखी गाठ

© कांचन सातपुते हिरण्या.



“अगदी लाखात एक स्थळ आहे विनायकराव. आपल्या अवंतीचं कल्याणच होईल त्या घरात. राणीसारखं राज्य करेल. सुनंदावहिनी अहो कसला विचार करताय ?" स्थळं दाखवणारे मोहनकाका बोलत होते. 

पण विनायकराव आणि सुनंदावहिनी शांतच. 

त्यांची एकुलती एक लेक रूपानं, गुणांनी सोज्वळ, एमए पदवीधर शिवाय पुढं कथ्थकमध्ये पीएचडी करायचा तिचा मानस. 

स्वभावानं ती जेवढी शांत, समंजस तेवढीच स्वाभिमानी मुलगी. तिच्यासाठी साजेसा, समंजस जोडीदार, मायेचं सासर हवं होतं त्यांना. 

अजून कशात काही नाही तरी तिच्या पाठवणीच्या विचारानंच त्यांना गलबलून आलं.

शिक्षण घेता घेता एका कथ्थक प्रशिक्षण संस्थेत नोकरीही करत होती अवंती.

विनायकराव आणि सुनंदाताईंनी, “पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊ मग पुढे बघू काय करायचं " असं मोहनकाकांना सांगितलं.

संकेत आणि त्याच्या आई वडिलांना अवंती बघताक्षणीच आवडली. 

गप्पागोष्टी करता करता चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. 

संकेत आणि अवंतीला एकमेकांशी बोलता यावं म्हणून टेरेस गार्डनवर पाठवलं.

संकेतचे बाबा म्हणाले, “मोहन काकांनी तुम्हांला सांगितलंच असेल आमचा पिढीजात सोन्याचांदीचा व्यवसाय. दोन मोठी दुकानं आहेत. त्यामुळंच संकेतने पोस्ट ग्रॅज्युएशननंतर व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेऊन माझा भार हलका केला."

संकेतच्या बाबांचं बोलणं मध्येच तोडत त्याच्या आईने सुरुवात केली, “आम्हांला बाकी काही नको लग्न मात्र आमच्या प्रतिष्ठेला साजेसं करून द्या."

पाहुणे मंडळी परतली ती लग्नाची तारीख काढून कळवतो म्हणूनच.

“आई , काय म्हणत होते त्यांचे आई बाबा?" अवंतीने आईला विचारलं.

“काही नाही गं लग्न चांगलं करून द्या म्हणाले फक्त. तुला कसा वाटला गं मुलगा?"

“तसा चांगला वाटला पण त्याच्या वागण्या बोलण्यातून मला जरा वेगळंच काहीतरी जाणवलं.

आमचा मोठा व्यवसाय, मोठी उलाढाल, हे असं ते तसं आणि तू लग्नानंतर काहीच नाही केलं तरी चालेल . त्याची काही गरज नाही. मला खूप विचित्र वाटलं ते सगळं."

“अगं म्हणताना म्हणतात सगळेच पण लग्नानंतर जपतील तुझी आवड. तुझ्या बाबांनी मला नर्सिंगची नोकरी करून दिलीच की किती वर्षं."

लग्नमंडपात गडबड सुरू होती. 

तीन दिवसांपासून सुयोग गार्डनमध्ये सुरू असलेल्या मेहेंदी, संगीत, या सोहळ्याचा आज मेरूमणी, अवंती आणि संकेत यांचा विवाह सोहळा!

लग्नघटिका जवळ आली. 

नवरदेव घोड्यावरून आला. अवंतीच्या दोन्ही आत्त्या औक्षणासाठी पुढे झाल्या. 

चांदीच्या मोठ्या नक्षीदार ताटांमधून औक्षण केलं. ती ताटं आणि त्यात ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या संकेतच्या काकूने पटकन घेतल्या. तिथं असलेल्या सगळ्यांनाच हा प्रकार खटकला.

आता मंगलाष्टकं सुरू होणार इतक्यात संकेतच्या काकांनी विनायकरावांना बाजूला बोलावलं आणि त्यांना काहितरी सांगितलं .

काही कळायच्या आतच विनायकराव धाडकन खाली कोसळले. 

गोंधळ ऐकून अवंती बाबांकडे धावली, “बाबाS S S"

तिच्या हाकेने सगळं वातावरणच बदललं. 

सुनंदाताई त्यांचं डोकं मांडीवर घेऊन बसल्या. 

कोणीतरी तोंडावर पाणी शिंपडायला सांगितलं. त्यांना थोडं बरं वाटलं. 

शेजारी राहणाऱ्या डॉ. श्रीरंगने विनायकरावांना, “बहुतेक लग्नामुळे गडबड झाली त्याचा परिणाम असावा आता जरा विश्रांती घेऊ द्या काकांना. उद्या आपण चेकअप करू, " असं सांगितलं.

इकडं हे सगळं चालू असताना अवंतीने बाबांच्या हातातला कागद वाचला आणि ती जवळ जवळ ओरडलीच, “काय आहे हे ? 

अवंतीने संकेतच्या समोर तो कागद धरला ,“सुशिक्षित म्हणवता ना हो स्वतःला. जनाची नाही तरी मनाची तरी ठेवायची. काहीच वाटलं नाही का तुम्हाला."

“अवंतीS S S!" आईने तिला पटकन मागे ओढलं. 

कोणालाच कळेना हे सगळं काय चाललंय. अवंतीच्या आत्या, मामा, मावशी, श्रीरंगचे आई बाबा सगळेच तिच्या जवळ आले.

“अवंती बेटा, काय झालं?"

“ऐका, सगळ्यांनीच ऐका, हे व्यापारी लग्नाचाही सौदा करायला निघालेत. लग्न ठरल्यापासून माझ्या बाबांचे किती पैसे खर्च झालेत याचा हिशोबच नाही! यांच्या मागण्या काही संपतच नाहीत. 

साड्यांची खरेदी अशीच हवी, दागिने याच घाटणीचे, तीन दिवसांसाठी आम्हांला हवं असलेलंच रिसॉर्ट बुकिंग, आमच्या पाहुण्यांना आवडेल असाच मेन्यू जेवणात हवा, मर्यादाच नाही यांच्या वागण्याला! 

आणि आता तर कळसच झालाय. या अतिसुशिक्षित माणसांना दहा लाखांचा चेक हवाय. 

का, कशासाठी ते माहीत नाही आणि वर हा माणूस म्हणतो आई बाबा आपल्यासाठीच तर हे सगळं करताहेत. नकोय मला हे सगळं."

काही वेळापूर्वी नववधूच्या वेशातील लाजेने लाल झालेली अवंती विजेसारखी तळपत होती.

“विनायकराव, ही अशी मुलगी आम्हांलाच नकोय! " संकेतच्या वडिलांचा भीती घालण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

“लगेच निघा , कशाची वाट बघताय. या सगळ्याचं उत्तर तुम्हाला पुढे द्यावंच लागेल हे मात्र लक्षात ठेवा ." रडता रडता अवंती खाली बसली. 

पुढे काय होणार कोणालाच कळेना. सगळाच प्रकार अनपेक्षित, चीड आणणारा होता. 

अवंतीच्या सुन्न झालेल्या आई बाबांना नातेवाईक धीर देत होते.

“अवंती, माझ्यासोबत यायला आवडेल तुला? तुझी तयारी असेल तर मीही एका पायावर तयार आहे." डॉ श्रीरंगने हात पुढे केला.

अवंतीनं त्याच्या हातात हात दिला!

“मनापासून प्रेम होतं गं अवंती माझं तुझ्यावर पण कधी कधी जातीपातीची बंधनं अजूनही आड येतात म्हणून विचारलं नाही. आपली लग्नगाठ मात्र स्वर्गातच बांधली होती."

आणि वाचकहो, लग्नगाठ बांधून आपल्या अवंतीची श्रीरंगसोबत आनंदाश्रूंच्या वर्षावात पाठवणी झाली.

© कांचन सातपुते हिरण्या.

सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने