मोह

© सौ. प्रतिभा परांजपे



उज्वलाबाईंनी घराचे कुलूप उघडून बॅग घरात ठेवली. 
तेवढ्यात रेखा, त्यांची कामवाली आली. "काय काकू ,प्रवास कसा झाला? दादा वहिनी कसे आहेत?" असे विचारत स्वयंपाक घराकडे वळली.

उज्वलाबाई हाश्य हुश्श करत सोफ्यावर बसल्या..

रेखाने पाण्याचा ग्लास देत विचारले "काकू चहा घेणार?"

"होsग बाई, आधी चहा पीते, मग अंघोळ, पूजा. किती दिवस झाले देव पारोसे आहे."

"जेवायला काय करू काकू?"

"फक्त खिचडी कर ग, बाकी काही नको.--उद्या पासून पाहू," म्हणून त्या अंघोळीला गेल्या.

दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर त्यांनी सुनेला फोन लावून व्यवस्थित पोचल्याचे कळवले.

"आई--- फार दगदग नका करू".

"नाही ग रेखाने सगळं केर, पाणी भरणे करून ठेवलं होतं त्यामुळे मी आरामातच आहे…"

" तुम्ही नसल्याने घर खूप सुनेसुने वाटते आहे. परी पण उठल्यावर तुम्हाला शोधत होती."

" येईन ग मी परत दिवाळीला.आहे का ती? दे ना!"

"बाहेर खेळायला पाठवले आहे तिला. जरा इतर मुलां मधे खेळेल, नाही तर तुमची आठवण काढत रडत बसली असती."

" बर बर "  म्हणत उज्वला ताईंनी फोन ठेवला व त्या बाहेर बागेमध्ये आल्या.

एकेका झाडाकडे जात त्या झाडांना पाणी घालत त्यांच्याशी बोलू लागल्या, "किती दिवस झाले रे गुलाबा, एक बहर येऊन गेला तुला.  आता माळी आला ना की उद्या कटिंग करायला सांगते, आणि हो बरं का सोनचाफ्या तिथे पण एक सोनचाफा होता घरात तुझ्याच सारखा. त्याला पाहून तुझी सारखी आठवण यायची."

" काकू केव्हा आलात ??" बाहेरून शेजारच्या बेहर्‍यांच्या सुनेचा आवाज आला.

"अग आज सकाळीच."

"यंदा खूप मुक्काम केला?"

"हो ग, मुलगा सून येऊ देतच नव्हते."

"मग-- राहायचे ना अजून.!" त्यावर उज्वलाताई फक्त हसल्या.

रात्री झोपतांना उज्वला ताई विचार करत होत्या. खरं आहे मुलगा आणि सून, नात किती जीव लावतात तरीपण आपण परत आलो कां ? हे घर आपल्याला बोलावत होते का ? इतके वर्षे इथे गेले, इथल्या वास्तूचा मोह आपल्याला ओढ लावत होता.

उज्वला ताईंना आठवलं लग्न झाल्यानंतर बर्‍याच वर्षांनी हे घर त्यांनी व सुधाकर रावांनी मिळून बांधलं. पण हे घर बांधायला लागणार्‍या पैशांसाठी सुधाकर रावांनी दोन नोकर्‍या केल्या. उज्वलाताई स्वत: शाळेत शिक्षिका होत्या. नोकरी बरोबर ट्युशन ही घेत होत्या.
तेव्हा कुठे जागा घेतली. सुरवातीला दोनच खोल्या बांधल्या, नंतर पैसा जमला तसे पूर्ण बांधकाम केले.

खूप प्रेमाने सजवलं घर दोघांनी. "साफल्य" हे नांव ठेवले, . मुलं झाली, मोठी होऊन त्यांची शिक्षण झाली, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेली पण आपण इथेच राहिलो. 
या घराची उब होती. वयाच्या साठीला सुधाकर अचानक सोडून गेले. पण हे घर, त्यानी मात्र कायम सोबत केली.

वयापरत्वे शरीर थकत चाललं तशी मुलगा व सून तिकडे येण्याचा आग्रह करू लागले ,तेव्हा काही दिवस तरी जावे या हिशोबाने उज्वलाताई मुलाकडे गेल्या.

चार महिने झाले पण मुलाने आणि सुनेनी येऊच दिले नाही. नात परी ने तर त्यांची बॅग लपवून ठेवली. पण आता मात्र त्या जाते- जाते करायला लागल्या तेव्हा नाईलाजाने त्याने होकार दिला. 
परीने आपली पिशवीही भरून आणली. ती शाळेत गेल्यावरच त्या निघाल्या.

सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली पण आपण कुठे आहोत हेचं काही क्षण उमगेना. 
प्रातःविधी उरकून उज्वला ताईं बाहेर फिरायला निघाल्या.

बरेच महिने गावात नव्हत्या त्या मुळे बरेच जणांनी त्यांची विचारपूस केली. फिरुन आल्या वर चहा घेत उज्वला ताईंनी टीव्ही लावला, ध्यान नावाचे चैनल लावले, त्यात योग ,ध्यान धारणा असे विविध प्रकार दाखवत.

आज योगी चिन्मयानंद आले होते. त्यांनी प्रवचनात माया,मोह आदी षडरिपूं पासून कसे दूर राहावे याचे सुंदर निरूपण केले.
ते म्हणाले, "तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा मोह आहे हे प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे त्यानंतरच त्यातून कसे सुटायचे हे कळेल".

उज्वला ताईंच्या मनावर या प्रवचनाचा खोलवर परिणाम झाला.
त्याही विचार करू लागल्या, जरी आपण म्हणतो की मला आता काही नको आहे तरीही बऱ्याच मोहांनी आपल्याला गुंतवून ठेवले आहे.

स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या मनात यादी करु लागल्या. तेव्हा त्यांना जाणवले अजून बरेच काही सोडायला हवे आहे. मनाला मोहवणार्‍या अजून बऱ्याच गोष्टी आहेत.

टीव्ही पाहून झाल्यावर अंघोळ देवपूजा केली तो पर्यंत रेखा हजर,

"काकू रातच्याला झोप आली कां नाही?"

"हो ग छान '..

"खर हाय आपल घर ते आपलंच."

"अस नाही ग-- तेही आपलच आहे ."

"मग --कशा पाई घाई केली ? रहायचं की निवांत."

"तसं नाही गं-- पण इथली आठवण यायला लागली. या घराची, बागेची काळजी वाटत होती. मोह आहे सगळा."

कपाट उघडून त्या उभ्या राहिल्या.
बर्‍याच साड्या नुसत्याच पडून होत्या. लग्नात सासरहून पांघरलेला शेला , जीर्ण झालेला, घराच्या वास्तू च्या वेळी सुधाकररावांनी घेतलेली साडी, अश्या अनेक साड्या आठवणींचे फेर धरून नाचू लागल्या. घाबरुन त्यांनी अलमारी बंद केली.

दुपारी उज्वला ताईंची मैत्रीण भेटायला आली. सोबत लाडूचा डबा.

"अगं बाई तुझ्या कडे होता हा डबा? मी विचारच करत होते कि कुणाला दिला.?"

स्वामीजींनी सांगितले तसा विचार आता उज्वला ताई करु लागल्या.

कशा कशा चा मोह आहे? कपडे ,भांडी ,घरातील इतर सामान आणि सर्वात महत्वाची म्हणजे ही वास्तू. आता त्यांना बऱ्याच गोष्टी दिसू लागल्या. एवढेच काय तर त्यांनी लावलेली झाडंं फुलंंही.

उज्वलाताई विचार करू लागल्या झाड कुठे ठेवतात मोह फुलांचा? ते तर धरणीला अर्पित करूनच टाकतात ना!

हे घर इथल्या आठवणी हा एक मोहच आहे. आपलं घर ,आम्ही बांधलेलं, हा अभिमान, हा बंध त्यांना इथे यायला भाग पाडतो. ही भांडी,डबे, कपडे साड्या,दागिने घरातल हे सामान प्रत्येक वस्तू बरोबर त्या प्रसंगाची आठवण असे अनेक मोह आहेत, नाहीतर मुलगा सून किती प्रेमाने ठेवतात.

या मोहातून कसे दूर व्हायचे? हा मोह सुटला तरच निश्चिंतपणे मुला सुने सोबत राहू शकेन.

एक दिवस त्या सहज मैत्रिणीजवळ बोलल्या, तेव्हा तिने पर्याय म्हणून "अगं, घर भाड्याने देऊन टाक." म्हणून सुचवले.

उज्वला ताईंनी मुलाला व सुनेला विचारले,  "घर भाड्याने दिले तर? "

मुलगा म्हणाला, "काही हरकत नाही, पण मधून मधून त्यावर लक्ष ठेवावे लागेल ".

उज्वला ताईंना जाणवले, भाड्याने दिले तरी ते आपले आहे हा भाव मनात राहीलच आणि मग मन परत ओढ घेणारच .पूर्णपणे मन काढायचे तर ते आपले नसले तरच.

त्या बहिणी जवळ बोलल्या. तिने चांगलीच कान उघडली केली "अग असं करू नको उद्या तुझं पटलं नाही तर, आहे तेही घालवून बसशील, मग कुठे जाणार?

पण उज्वला ताईंनी स्पष्ट सांगितले, "माझा मुलापेक्षाही सुनेवर विश्वास आहे. तेव्हा ती मला अंतर देणार नाही हे मी अनुभवले आहे ."

"पहा बाई मग तू तुझं" असे म्हणून बहिणीने विषय थांबवला.

उज्वला ताईंनी मुलीला ही परत विचारले, "मी घर विकायच ठरवते आहे तर तुला वाटणी हवी आहे का? जावईबापूंशी बोलून सांग." 
तशी मुलगी म्हणाली, "आई मी मागेच तुला बोलले होते मला काहीही नको आहे. जेवढे द्यायचे तेवढे तू आधीच देऊन झालेले आहे तू खुशाल दादाच्या नावाने कर."

आता मात्र उज्वला ताईंनी मन पक्क केलं.आपण जिवंत असतानाच घर विकून पैसे मुलांच्या नावावर करावे जास्तीच्या साड्या आश्रमात दान कराव्यात, इतर सामान ही गरजूंना द्यावे. म्हणजे परतीचा मार्ग खुंटेल. तेव्हाच मोहातून सुटायला होईल.

उद्याच एका ब्रोकरला विचारायला फोन करावा, असा विचार करता करता त्यांना शांत झोप लागली.

समाप्त

© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

या कथाही अवश्य वाचा

सावट

सासर माहेर 

मी माझी समर्थ आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने