नथीची गंमत

© सौ. प्राजक्ता पाटील




" वात्सल्य…" नावाचा शहरातील मध्यवर्ती भागात असलेला अतिशय सुंदर आणि नात्यांच्या गोड बंधनात मोहोरलेला हा बंगला सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असायचा. 

चार भावाचं एकत्र कुटुंब आणि मोठ्या भावाच्या दोन सुनांनी जपलेली घराची परंपरा पाहून खरचं नाती निभावणं म्हणजे काय असतं ? हे या आदर्श कुटुंबातील सदस्यांना पाहून लक्षात येत होतं. 

सात्विक आणि ऋतिक ही दोन वेगवेगळ्या भावांची मुलं पण त्यांचा जन्म एकाच महिन्यातला असल्याने लहानपणापासून सोबतच मोठी झालेली भावंडे स्वभावाने मात्र भिन्न होती. 

सात्विक हा अबोल आणि वेळेचा पक्का होता. पण ऋतिक मात्र बोलका आणि वेळेचे गांभीर्य न पाळणारा असा होता. त्यामुळे सात्विकचे थोडे जास्त कौतुक व्हायचे. आता दोघेही मोठे झाले होतो. 

सात्विक एका संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत होता. तर ऋतिक ही आयटी कंपनीत नोकरी करत होता. ऋतिक आणि सात्विक च्या लग्नासाठी स्थळं येत होती. तेव्हा बोलका स्वभाव असणाऱ्या ऋतिकने त्याला एक मुलगी आवडते हे घरच्यांना स्पष्टपणे सांगून टाकले पण घरच्यांनी मात्र सात्विक आणि ऋतिक यांचे लग्न एकाच मांडवात होणार हे सांगून टाकले. 

घरातील तिन्ही मुलींची लग्न एकत्रच केली होती. आणि थोरल्या दोन्ही सुनाही एकाच मांडवात लग्न करून घरात आल्या होत्या त्यामुळेच खर्च ही वाचतो आणि वेळही वाचतो असं मोठ्या बाबांच म्हणणं होतं. 

मोठे बाबा म्हणजे सात्विकचे आजोबा. आणि त्यांचा शब्द घरातील सगळ्यांकडून अगदी आपुलकीने पाळला जात होता कारण एवढ्या मोठ्या परिवाराला एकत्र गुंफून ठेवण्यात त्यांचीच तर भूमिका महत्त्वपूर्ण होती. 

सगळेजण निघून गेले पण ऋतिक मात्र सात्विकला म्हणाला, "भावा जरा लवकर घे लग्नाचं मनावर. कधी नव्हे तो गर्लफ्रेंडला दिलेला शब्द पाळायचा म्हणतोय तो ही पाळला जात नाही तुमच्यामुळं."

सात्विक हसून म्हणाला ," म्हणजे फक्त शब्द पाळण्यासाठी लग्न करायचंय तुम्हाला ?"

"प्रेम तर खूप करतो मी ज्योती वर पण आजपर्यंत एकही दिलेला शब्द मी पाळला नाही हा पाळणार होतो पण तुम्हाला मुलगी पसंत पडत नाही. काय करणार ?"

तेवढ्यात मोठ्या वहिनी दोन्ही दिरांसाठी चहा घेऊन आल्या मग विषय बदलला गेला.

पण सात्विकला ऋत्विक म्हणतोय ते ही खरं वाटलं, ज्योतीलाही ऋत्विक दिलेला शब्द पाळत नाही हे माहीत होतं. 'त्यामुळेच मी लवकर लग्नाच्या बाबतीतला निर्णय घेईन' हा सात्विक मनात विचार करत होता. 

आई सात्विक विचारात गुंतलाय हे पाहून सात्विकला म्हणाली , सात्विक अरे कसला विचार करतोय?"

"मी प्राध्यापक झालोय खरा, पण माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड पेपर विचारशील ना आई ? तर तो योग्य वधु निवडण्याचा आहे बघ." सात्विक आईला म्हणाला.


"अरे काय हे सात्विक ? तुला आवडणाऱ्या मुलीला हो म्हण. त्यात अवघड काही नाही. आणि जर तुला दुसरी कोणती मुलगी आवडत असेल तर तसं सांग आमची परवानगी असेल हो. शेवटी तुला त्या मुलीबरोबर आयुष्य घालवायचयं." आई म्हणाली.

सात्विकसाठी येणाऱ्या स्थळांची यादी व फोटो यांची रेलचेल सुरू झाली. प्रत्येक फोटो ला काहीतरी नकारात्मक टिप्पणी देत सात्विक विषय टाळतोय हे घरच्यांच्या लक्षात आलं होतं. 

पण अबोल असलेला सात्विक, ऋत्विक सारखा पटकन मनातलं बोलून दाखवणार नाही अशी बाबांची पक्की खात्री होती. 

त्यामुळे आपणच त्याला विचारावे हा मनात विचार करून बाबा सात्विकला म्हणाले, "आधीच आहे का कोणी तुझ्या मनात ? असेल तर सांग माझीही काही हरकत नाही. पण काही गोष्टी वेळेत झालेल्या चांगल्या असतात अरे ." असे बाबांनी विचारताच सात्विकचा प्रफुल्लित झालेला चेहेरा साऱ्यांच्या नजरेनी अगदी अचूक टिपला होता. 

सात्विकने "हो" म्हणताच, "आता मुलीचं नाव काय आहे ?" हे तुला सांगावच लागेल. सगळेजण एकदम म्हणाले.

"अलका नाव आहे तिचं." सात्विक अगदी चेहऱ्यावर स्मितहास्य देत म्हणाला.

"नाव तर छान आहे. पण ती कुठे राहते ? काय करते ? हे पण सांगा." मोठी वहिनी अबोल दीराला बोलायला भाग पाडत होती.

"आता तुमचे पुढचे प्रश्न सुरू होण्याआधी मी उत्तर द्यायला सुरुवात करतो. असं म्हणून सात्विकने अलका ही त्याची कॉलेजची मैत्रीण असून ते दोघे निव्वळ योगायोगाने एकाच संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतायेत हे सांगून टाकलं. फोटो पाहायचा असेल, तर तोही दाखवतो." म्हणून सात्विकने अलगद खिशातून मोबाईल काढला आणि साजिरी- गोजिरी अलका पाहताच क्षणी सगळ्याना आवडली. 

हा ,पण हे सगळं खरं असलं तरी एक समस्या आहे." सात्विक च्या या वाक्याने आनंदी असलेल्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले.

"आता आणि काय झालं दादा ?" चिन्मय सात्विकला म्हणाला. चिन्मय घरातील शेंडेफळ होते.

सात्विक म्हणाला , "अरे काही झालं नाही, पण जे होणार आहे त्यासाठी समोरची व्यक्ती तयार हवी ना."

"म्हणजे ?" सगळे एका सुरात म्हणाले.

"म्हणजे मी अलकाशी अजून लग्नाविषयी काहीच बोललो नाही. जिच्याशी लग्न करायचं तिला विचारायला हवं की नको ?" सात्विक म्हणाला.

"अरे देवा , मग विचार लवकर आणि सांग आम्हाला. आई म्हणाली.

"आणि हो भाऊजी, आपल्या घरी लग्न करून येण्यासाठी मुली उत्सुक असतात. त्यामुळे तुमची अलकाही नाही म्हणणार नाही हो तुमच्याशी लग्न करायला, याची मला खात्री आहे." मोठ्या वहिनी हसत हसत म्हणाल्या.

सात्विकने अलकाला प्रपोज केले. अलकालाही सात्विक कॉलेजमध्ये असल्यापासून आवडत होता. त्यामुळे तिनेही लगेच लग्नाला होकार दिला. 

रीतसर कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला.लग्नाची बोलणीही झाली. घरी आल्यावर मात्र सगळेजण साखरपुड्याच्या तयारीला लागले.

"चला आधीच खूप वेळ लावलाय नाव सांगायला. आता लग्नाच्या तयारीला वेळ नको लागायला." असं म्हणून आई स्वयंपाकघरात गेली.

साखरपुड्याची तारीख ठरली. मोठीआई आणि मोठेबाबा सात्विकसोबत बँकेत गेले.

 तिथून लॉकर मधील सर्व दागिने काढले. घरी गेल्यावर सात्विकला आवर्जून सर्व दागिने दाखवले. दोन- दोन दागिन्यांचे ग्रूप करून सात्विकला आणि ऋतिकला ते उचलायला सांगितले. 

दोघांनी एक एक पॉकेट उचललं. पॉकेट उचलल्यावर मोठीआई म्हणाली, "ते दागिने सात्विक आणि ॠतीक च्या बायकांना साखरपुड्या दिवशी आवर्जून घालायचे आहेत, कारण ते दागिने खानदानी असून पूर्वजांपासून साखरपुड्यात घरातील सुनांना घातले गेले आहेत. आणि हे उरलेले सर्व दागिने असेच या घरातील सर्व सुनांना मिळणार आहेत."

दोन्ही मोठ्या सुना म्हणाल्या," हो भाऊजी आम्हालाही मोठ्याआईकडून साखरपुड्यात दोन दोन दागिने मिळाले आहेत. पण बघा बरं तुमच्या बायकोला काय मिळाले ते ?"

सात्विक ने पॉकेट उघडले तर त्यात एक हार आणि एक नथ दिसली.

"मोठीआई, ही नथ पूर्वीपासून वापरलेली आहे ?"

"हो. आपल्या घरात पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आहे. येणाऱ्या सुनेला साखरपुड्यात पूर्वजांचे दागिने देण्याची. ही नथ तुझ्या आजीनी मला दिली होती. त्याच्या आधी कित्येक पिढ्यांपासून ही नथ सोबत आहे आपल्या. आता साखरपुड्याच्या दिवशी मी ही नथ अलकाला देईन. मोठीआई म्हणाली.

"बरं. " असं म्हणून सात्विक बाहेर गेला.

सात्विकने अलकाला फोन केला. दोघांच्या रोमांटिक गप्पा सुरू झाल्या तेवढ्यात अचानक सात्विकला मोठीआईने सांगितलेल्या नथीची आठवण झाली. "नथ" हा शब्द ऐकताच अलकाला तर घामच फुटला.

"नथ मी कशी घालणार ?" अलका म्हणाली.

"कशी म्हणजे ? नाकात घालतात नथ." सात्विक गंमतीत म्हणाला.

"माहीत आहे ना मला पण नाकात घालतात नथ. पण नथ घालायला नाक टोचलेलं हव. लहान असताना भीतीपोटी टाळलं होतं नाक टोचायच. पण आता काय करू?" अलका म्हणाली.

"डोन्ट वरी. मी करतो काहीतरी." असे म्हणत सात्विकने ज्वेलर असलेल्या त्याच्या एका मित्राला फोन केला. तेव्हा मित्राने त्याला विदाऊट पेन नाक टोचता येऊ शकतं हे सांगितले.

 "शुभकाम को देरी क्यू ?" म्हणत सात्विक सोबत जाऊन अलकाने शेवटी नाक टोचले. आपल्या सुनेचं नाक टोचलेलं नव्हतं हे गुपित सासरच्या मंडळीना अनभिज्ञ राहिलं. या आणि अशा कित्तेक कठीण प्रसंगात "डोन्ट वरी" म्हणत सात्विकने अलकाला मनापासून साथ दिली.


"नथ"ही गोष्ट खुप छोटी
पण सासरची प्रत्येक परंपरा निभावण हीच असते प्रत्येक स्त्रीची खरी सचोटी
आळीमिळी गुपचिळीमध्ये सख्याची साथ असेल मोठी
तर संसाराची पास होते प्रत्येक कसोटी."


© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने