स्वप्नपूर्ती



© अनुजा धारिया शेठ



संस्कृती सोसायटीमध्ये सर्वांच्या तोंडावर फक्त आणि फक्त अरूणाताई आणि सुभाषरावांचे नाव होते. मुले मोठी होऊन घराबाहेर काय पडली? ह्यांचा परत हनिमूनच सुरू झालाय. काय ते कपडे घालतात, काय फोटो काढतात.

ह्या अरूणाला शोभत का ह्या वयात? झुम्बा काय करते, सकाळी जोडीनं मॉर्निंग वाॅकला जातात दोघे. अगं आता ड्रेस नाही घालत ती.. तें हल्लीच्या मुलीं सारखे ट्रॅक पॅन्ट आणि टि शर्ट घालून जाते. आल्यावर त्यांच्या हॉलच्या बाल्कनीत दोघे जोडीनं योगा करतात. सर्व बायकांना कट्ट्यावर बसायला हा एकच विषय मिळाला होता. त्या जोडीवर वॉच ठेवणं हेच काम मिळाले होते.

ते दोघे मात्र आपले आयुष्य एन्जॉय करत होते, राहिलेले क्षण नव्याने जगत होते. खर तर दोन्ही मुले परदेशी स्थायिक झाले आणि अरुणा ताई खचून गेल्या. त्या दोघांचं लव्ह मॅरीज. दोघेही शिक्षक होते. आता रिटायर झाल्यावर मुलांसोबत आयुष्य एन्जॉय करायचं असे त्यांनी ठरवलं. पण दोन्ही मुलांनी बाहेर स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. आता ह्या उतारवयात दोघांना घर खायला येई.

शेवटी सुभाषरावांनी त्यांना समजावून सांगितलं, आयुष्यभर आपण मुलांसाठी कष्ट केले. आता आपण स्वतःसाठी जगायचं.. जे जे राहून गेले तें सर्व करायच.. अरुणा ताईंना त्यांच म्हणणं पटले.


त्या दिवसापासून त्या दोघांनी स्वतःचे वेळापत्रक बनवले, त्या प्रमाणे ते दोघेही स्वतःसाठी जगू लागले. अरुणाताईंनी तर बकेट लिस्ट तयार केली. दोन्ही मुलांकडे जाऊन काही दिवस राहून फिरून आल्यावर त्यांना खूप छान वाटत होते.

आता त्यांनी स्वतःची तब्बेत, आवड, छंद जोपासायला सुरुवात केली. बायका कूजबूजत होत्या, त्यांना जाणवलं की त्यांना वाईट वाटायचं.. सुभाषराव त्यांना समजावायचे "कुछ तो लोग कहेंगे, लोंगोंका काम है कहना.." त्यांचे असे बोलणे ऐकून त्या परत खुश व्हायच्या.

बालपण, तरुणपण राहून गेलेले सर्व क्षण अनुभवताना स्वतःसाठी जगताना त्यांना खूप मोकळे आणि छान वाटत होते.

जिल्हास्तरीय 'श्रावणक्वीन' स्पर्धा आयोजित करण्यात आली. अरूणाताईंना ह्या गोष्टीची आवड आधीपासूनच होती. त्यांनी घरात सांगितले, सुभाषराव तर नेहमीच त्यांना सपोर्ट करायचे, मुलाना ही गोष्ट समजताच त्यांनी तिकडून काही वेस्टर्न ड्रेस सुद्धा पाठवले. 

नियमित व्यायामामुळे त्या बऱ्याच मेन्टेन झाल्या होत्या. वयोमानानुसार शरीराला शेप राहिला नसला तरी स्टॅमिना खूप वाढला होता. या एका वर्षांत त्यांनी ट्रेकींग, सायकलिंग अशी एक एक स्वप्न पूर्ण केली होती. 

आता ही स्पर्धा आहे हे कळल्यावर त्यांनी मनापासून भाग घ्यायचा ठरवला.

ऑडिशनला आलेल्या तरुणी जास्त होत्या. पण आयोजकांनी मिस आणि मिसेस असे दोन भाग केले होते. अरुणाताईंना पाहून काही कुत्सितपणे हसल्या तर काहींनी त्यांचे कौतुक केले.

कला सादर करताना त्यांनी जिजाबाईंचे ड्रेस अप करून सर्व सभागृह खिळून राहिलं असे वक्तव्य केले. त्यांचा उत्साह त्यांची तयारी बघून तिथे असलेल्या सर्वांना अप्रुप वाटले. 

पहिली आॅडीशन झाली आणि अरुणाताईंनी स्पर्धेत भाग घेतलाय याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. काही कुचेष्टा करत तर काही कौतुक.. पण त्या काही मागे हटल्या नाहीत..

एक एक पायरी पार करत त्या फायनल पर्यंत गेल्या. शेवटी सर्व हॉल खच्चाखच भरला होता. शॉर्ट वनपीस घालून रॅम्प वॉक करायची वेळ आली.. मनात थोडी भीती वाटली, पण परत मनाने सावरले मी हे सगळ स्वतःसाठी करते. आज तो "सजना है मुझे खुद के लिये". कॊणी काही बोलू दे मी लक्ष देणार नाही, असे म्हणत मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी एन्ट्री केली. जोरात टाळ्या झाल्या.

आयोजक, परिक्षक सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटले. आणि निकाल जाहीर झाला. Second Runner up of "SHRAVAN QUEEN" goes to मिसेस अरुणा पाठक.. त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांना स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी बोलावण्यात आले.

मिसेस 'श्रावणक्वीन' हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्यावर, अरुणाताई अगदी भरभरून बोलत होत्या, मला इथे या वनपीसमध्ये बघून सगळ्यांना वाटत असेल, "साठी बुद्धी नाठी" झाली की काय हिची? पण खरच माझे वय फक्त १६, म्हणजे त्याच्या उलट बरं का? त्यांच्या ह्या बोलण्यावरून त्यांच्या मिश्कील स्वभावाची ओळख झाली.

आमची दोन्ही मुले परदेशी असतात, त्यामुळे इथे आम्ही दोघेच, म्हणून जे क्षण निसटून गेले, ते जगण्याचा प्रयत्न करतो, जे आहे तें सुंदर कसे बनेल याचा विचार करतो.

आज त्यातलेच एक स्वप्न पूर्ण झाले, माझ्या बरोबरीच्या सर्व बायकांना मी एवढंच सांगेन, आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे तें स्वतःसाठी भरभरून जगा, लोकं काय म्हणतील? या वयात हे शोभतं का? असा विचार न करता राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करा. 

आपण बायका आपल्या संसारात अगदी साखरेसारख्या विरघळून जातो, आपले अस्तित्वच आपण विसरून जातो. नेहमीच प्रत्येक गोष्ट आपल्या घरासाठी नाहीतर घरातल्या कोणासाठी तरी करत असतो. कधीतरी स्वतःसाठी काहीतरी करून बघा. स्वतःच स्वताला स्पेशल मानायला शिका..

शेवटी मला सांगा आयुष्य म्हणजे काय हो? त्यावरतीच तयार केलेली रचना आज मी तुम्हाला सांगणार आहे.


खूप काहीआहे मनात,
कोणाच्या सांगूं कानात,
लिहायचंय पानापानात,
पण मिळत नाही वेळ....

मिळाला जरी,तरी बसत नाही कधीच मेळ....
अखंड सुरूच आहे हा संसाररूपी खेळ....
रोज सुरूच असते ही तारेवरची कसरत....
पण माझे छंद मी कधीच नाही विसरत....

सगळ्यांसाठी आपण राहतो झटत....
थकूनभागून आपण जातो सतत.....
किती करा कोणासाठी नसते,कोणालाच किंमत...
आपण मात्र म्हणून,हरायची नसते हिम्मत...

रडायचं, भांडायचं, हसायचं, रुसायच, पडायच...
हे सार करताना हरलो जरी...
आपल्यासाठी आपण परत उभे रहायच....

एकदाच मिळत आयुष्य, परत मिळत नाही..
म्हणूनच तें बनवायच एकदम सही....
आपणच आपल्याला मानायचे स्पेशल
मग् कॊणी काही बोलो, मनात रहात नाही त्याची सल...

आपल्यालाच द्यायचा आहे आयुष्याला आकार आणि उकार.....
कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.....

म्हणूनच मी एवढंच सांगेन तुम्हाला स्वतःसाठी जगायला, राहिलेली स्वप्न पूर्ण करायला कधीच वयाचे बंधन ठेवू नका. खरच स्वतःसाठी जगायला कधीच ''ना उम्र की सीमा हो.......''

त्यांच्या ह्या वाक्यावर जोरादार टाळ्या वाजतात..... पूर्ण सभागॄह दणाणून जाते.

सगळीकडे फक्त आणि फक्त अरुणाताईंचे कौतुक होत असते. नेहमी नाव ठेवणार्या त्या सोसायटी मधल्या बायकांनी महीला दिनाच्या निमित्ताने आज अरुणा ताईंचा सत्कार केला. तसेच त्या सर्वानी सुद्धा या महिला दिनापासून स्वतःसाठी जगायच ठरवले.


काय मग तुम्ही पण करणार ना सुरुवात आता स्वतःसाठी जगायला?

© अनुजा धारिया शेठ

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने