माझे बाबा

© सौ. प्राजक्ता पाटील





राधा आणि सौरभ इतकी नशीबवान मुलं होती की, सुख त्यांच्या पायाशी अगदी लोळण घेत होते. हवी ती वस्तू त्यांना हव्या त्या ठिकाणी पोहोच व्हायची. 

पण मनातून खंत वाटायची ती म्हणजे आईविना पोरक्या झालेल्या या मुलांना वाढवताना हाताचा पाळणा करत, काट्याच्या रस्त्यावरून केवळ मुलांसाठी अनवाणी चाललेल्या सोपानरावांची. इतका मोठा व्यवसाय उभा करणे केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या एका व्यक्तीला कधीच शक्य नव्हते. 

पण जेंव्हा एक वेळ अशी येते, जी होत्याचं नव्हतं करते; आणि त्यावेळेस व्यक्ती जो निश्चय करतो तो अथक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर पूर्णच करतो. आणि सोपाननेही तेच केले होते.

सोपान एका गरीब कुटुंबात जन्मलेला अतिशय गोंडस मुलगा होता. सोपान ज्या घरात जन्माला आला होता ते घर आर्थिक दृष्ट्या संपन्न नव्हते, पण त्याचबरोबर तो ज्या गावात जन्माला आला होता ते गाव, ना मनुष्य बळाने ना अत्याधुनिक सुविधांनी कशा म्हणजे कशानेच समृद्ध नव्हते. 

हे सोपान चे दुर्दैव होते. अवघं वीस घरांचं गाव. जनगणनेत घेतलेल्या नोंदी वरून केवळ नव्वद माणसं गावात आहेत हे समजले होते. गावातील घरं ही विखुरलेली होती. 

भावकीची घरं जवळ जवळच असायची पण सोपान च्या वडिलांना भाऊ ही नसल्यामुळे ह्यांच्या घराजवळ एकही घर नव्हतं.

 कधीतरी पाहुणी म्हणून येणारी सोपानची आत्या तिच तेवढी आली तर तिला कुठे ठेवू अन् कुठे नाही असं व्हायचं सोपान च्या घरच्यांना. आणि आत्याचा ही भावावर आणि भावजयीवर खूप जीव होता. 

सोपान तर भाऊ,भावजयीने नवसानं मागितलेलं एकुलतं एक अपत्य होतं. त्यामुळे आपल्या लाडक्या भाच्यासाठी आत्या एक पिशवी भरून खाऊ घेऊन यायची. त्याबरोबर चार-पाच खेळणी हमखास ठरलेली असायची.

गावात फक्त दोनदा एसटी येत होती. ती म्हणजे सकाळी सात वाजता आणि मग संध्याकाळी सात वाजता. सकाळी एसटी आली की सकाळचे सात वाजले आणि संध्याकाळी एसटी आली की संध्याकाळचे सात वाजले हे गावातील लहान मुल ही अगदी डोळे झाकून सांगत असे. 

इतक्या चोख वेळेत एसटी गावात नित्यनेमाने येत असे. पण पावसाळ्यात मात्र ना एसटी यायची, ना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती परत यायचा.

" ह्या पावसावर शेती हाय आपली, पण गावाला वेढा घातलेला हा ओढा मात्र शाप ठरतोय हो आपल्या माणसांसाठी." मोठमोठ्याने आक्रोश करत पार्वती रडत होती.

पार्वती सोपान च्या वडीलांच्या मावशीची मुलगी होती. आज तिचे वडील पाण्यात वाहून गेले होते. हे सोपान च्या वडिलांना समजले तेव्हां हातातले काम टाकून सोपान च्या वडिलांनी आणि आईनी पार्वती च्या घराकडे धाव घेतली.

सोपान ची आई म्हणाली,"जायचं कशाला व्हतं व तात्यांनी एवढ्या पावसात?"

"आवं, जाताना पाऊस ईल असं सपनात बी वाटलं नव्हतं बघा." पार्वतीची आई रडत रडत म्हणाली.

"रडू नका मावशी.तात्यांचं आयुष्यच तेवढं व्हतं बघा." सोपानचे वडील मावशीला म्हणाले.

पण दर पावसाळ्यात कोणाच्या न् कोणाच्या घरातून रडलेला सूर अचानक ऐकू यायचा आणि सबंध गावावर शोककळा पसरायची. 

गावातील सर्वांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे गावात ओढ्यावर पुल उभारण्या इतपत कोणीही धनिक नव्हते. 

गावातील माणसे गावातील बलुतेदाराच्या मदतीने लाकडी पुल उभारायचे. पण मोठ्या पावसात तो तात्पुरता पुल तग धरत नव्हता. आणि मग मनुष्य हानी ठरलेली असायची. शासनाकडून ही काही आर्थिक हातभार मिळत नसल्याने दरवर्षीच पावसाळा संबंध गावासाठी जीवघेणा असायचा.

सोपानराव वर्गात अतिशय हुशार पण आडाणी आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होते. सोपान रावांच्या पाठीवर कितीही नवस सायास केले तरी त्यांच्या आईला काही पुन्हा दिवस गेले नव्हते. 

दिवसभर शेतात राब राब राबून स्वतः एकवेळ पोटाला चिमटा काढून आईवडील सोपानला तळहाताच्या फोडासारखे जपत होते. 

गावात चौथीपर्यंत शाळा होती. सोपान मन लावून अभ्यास करायचा. शिक्षकांचा ही सोपान आवडता विद्यार्थी होता. प्रत्येक विषयात विशेष रूची असणारा सोपान मैदानी खेळातही मागे नव्हता. 

केंद्रीय शाळांमध्ये आयोजित निरनिराळ्या स्पर्धेत जास्तीत जास्त बक्षीस मिळवून आपल्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा सोपान शाळेच्या बाहेर ही सर्वांचा लाडका विद्यार्थी झाला होता. 

चौथी बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यातून तो पहिला आला होता. त्याला शासनाकडून स्कॉलरशिप जाहीर झाली होती. सगळेजण सोपान च्या नावाचा जयजयकार करीत होते. 

गावातील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सार्वजनिक वाचनालय अशा कित्येक ठिकाणी सोपान चा सत्कार करण्यात आला.

"पण चौथीनंतर पुढे काय करायचे ? गावात शाळा नसल्यामुळे शिक्षकांनी सोपानला विचारले.

"सर आमच्या गावात शाळा नसली म्हणून काय झाले ? आम्ही सगळेच जण शेजारच्या गावात जाणार आहोत शाळेला." एवढासा सोपान अगदी स्पष्टपणे म्हणाला.

उन्हाळा संपत आला आणि ऐन पावसाळ्यात शाळा सुरू झाल्या होत्या. सर्व मुलं गोणपाट, दप्तर, नव्या वह्या आणि कंपास खरेदी करून शाळेला जायला तयार झाली. 

आज ओढा पाण्यानं तुडुंब भरला होता. तरीही मुलं साखळी करून सावकाश ओढा पार करून शेजारच्या गावात असलेल्या शाळेत गेली. 

पण शाळा सुटल्यावर परत येताना मात्र आभाळ भरून आलं होतं अन् धो-धो पावसाला सुरुवात झाली. गुरुजींना पावसाच्या पाण्याचा अंदाज आला होता. 

मुसळधार पावसामुळे ओढ्याला नक्कीच पूर आला असेल हे गुरुजींच्या लक्षात आले होते त्यामुळे त्यांनी मुलांना आपल्या घरी मुक्कामाला ठेवून घेतले. गु

रूजींच्या पत्नींनी मुलांसाठी गरमागरम जेवण बनवले होते. मुले जेवण करून झोपी गेली पण इकडे गावातल्या लोकांची मात्र झोप उडाली. 

सोपान च्या आईच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब थांबायचे नाव घेत नव्हता.

"अगं तू रडलीस म्हणजे काय बदल होणार आहे का?" सोपान चे वडील नारायणराव आपल्या पत्नी लक्ष्मीबाईना म्हणाले.

"आवं माझं लेकरू कसं असंल? कुठं असंल ? म्हणून लय जीव कासावीस व्हतंय बघा. काहीच कळायला मार्ग नाही." डोळे पुसत पुसत सोपानची आई म्हणाली.

"उद्या समदं कळंल आणि आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही म्हणल्यावर, तो देव तरी आपलं कसं काय वाईट करंल सांग बरं." नारायणरावही म्हणाले.

दुसऱ्या दिवशी मुलं सुखरूप दिसली आणि घरच्यांच्या जीवात जीव आला. पण सोपान मात्र यापुढे शाळेसाठी कुठं जाणार नाही हा निर्णय पक्का झाला. 

आवड असूनही शिकता आले नाही ही खंत सोपानला होती पण आईवडिलांची काळजीही रास्त होती. 

पुढे सोपानचे लग्न झाले त्याच्यावर जी वेळ आली ती सोपानने आपल्या मुलांच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सविस्तर सांगितली ती अशी-

"दादा बाबा दरवर्षीचे जे करतात ते तुला योग्य वाटते का..?" राधा रागाने सौरभला म्हणाली.

"म्हणजे, काय म्हणायचे तुला..? बाबा पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत देतात आणि तीही त्यांनी कमावलेल्या पैशातून.. मग याचं तुला कसं काय वाईट वाटू शकतं? आवडते त्यांना मदत करायला.. " सौरभ ही आवाज चढवुन म्हणाला..

"तसं नाही रे दादा, एरवी थोडेसे पैसे मागितले तरी चार वेळा विचारतात.. कशाला हवेत म्हणून..? तेव्हा ते कंजूस वाटतात आणि आता मात्र इतके पैसे देताना, ते जराही विचार करत नाहीत म्हणून प्रश्न पडतो रे.." राधा म्हणाली..

डोळ्यात आलेले अश्रू लपवत,आलेले सोपानराव मुलांच्या नजरेतून सुटले नाहीत.. 

काळजावर दगड ठेवून सोपानराव म्हणाले, "तुमच्या दोघांचे बोलणे मी ऐकले.. आता माझ्या लक्षात आलं; तुम्ही मोठे झालात आणि मला वाटतं हीच ती वेळ तुम्हाला सगळं सांगण्याची.. "


"सॉरी बाबा.." राधा म्हणाली.


"सॉरी काय त्यात, आज ना उद्या तुम्हाला सांगणार होतोच पूरग्रस्तांसाठी का जीव तुटतो माझा ते..?" सोपानराव म्हणाले..


आपलं गाव आणि शेती तुम्ही कधी पाहिलीच नाही; कारण मीच नेहमी टाळलं तुम्हाला गावाकडे न्यायचं.. 

कारण त्या गावांमध्ये माझं कुणी राहिलंच नाही आणि होतच कोण रे माझ म्हणावं असं..? आईवडील लवकरच मला सोडून गेले. 

माझी पत्नी जी प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असायची.. परिस्थिती खूप हलाखीची होती; पण दिवस-रात्र कष्ट करून आल्यावर तुम्हा दोघांना पाहून कामाचा शीण निघून जायचा.

आम्ही दोघं तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासु नये; म्हणून रात्रीचा- दिवस करत होतो.. आपल्या मुलानं खूप मोठं करायचं; खूप शिकवायचं हे स्वप्न शालिनी आणि मी आम्ही दोघांनी पाहिलं होतं..

पण नियतीला ते मान्य नव्हतं, शेतातून घरी येताना ओढा होता.. पावसाळ्याचे दिवस होते. शालिनीने आज शेतात येऊ नये, अशी माझी इच्छा होती.. पण तुम्ही एकटे जाणार आणि मी घरी बसणार नाही हं..! असं म्हणून त्या दिवशी तीच मला एकट्याला सोडून कायमचं निघून गेली..

ओढ्याला पूर आला होता.. आपण पुराच पाणी ओसरल्यावर घरी जाऊ असं म्हणताच, " नाही, माझी मुलं घरी वाट बघत असतील." म्हणून ती हट्टाने माझ्यासोबत पुरातून पोहत यायला निघाली.. आणि तीच आमची शेवटची सोबत ठरली ती पाण्यासोबत वाहत गेली..

"रात्रभर तिथेच बसून राहिलो.. शेवटी सकाळी तिचा मृतदेह एका झाडाला लटकताना मला दिसला.. तो घरी आणून मी सर्व मृत्यूनंतरचा विधी पूर्ण केला; पण तिच्या मृतदेहाची राख मात्र अजूनही विसर्जित केली नाही.

कारण शहरात जाऊन कष्ट करून मी खूप मोठा होणार, मुलांना मोठं करणार.. आणि त्याच ओढ्यावर पुल उभारणार.." ही शपथ मी तिच्या राखेला स्मरून घेतली होती..

इतके दिवस तुम्हाला काहीच बोललो नाही; पण आज मी आर्थिक दृष्ट्या संपन्न बनलो आहे.. माझी मुलं मोठी झाली आहेत.. आणि पुलाचे काम ही पूर्ण झालं आहे..

 लवकरच आपण आईच्या देहाची राख आपल्या शेतात विधीवत विसर्जीत करूया.. आणि खऱ्या अर्थाने आईला श्रद्धांजली वाहूया..

राधा आणि सौरभने भरलेल्या डोळ्यांनी बाबांना मिठी मारली.. असे वडील जे मृत पत्नीच्या विरहाच्या दुःखात असूनही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी धडपडतात.. ते आपल्याला वडील म्हणून लाभले आहेत याचा मुलांना अभिमान वाटला.

© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने