प्रेमाचा धागा

© सौ. प्रतिभा परांजपे




रात्रभर पावसाची झड लागली होती. आता सकाळी सकाळी थांबला तरी आभाळ गच्च भरलेलं होतं.

सकाळ झाल्याची काही चिन्ह दिसत नव्हती. राधा बाईंना जाग आली तेव्हा ‌सात वाजत आले होते.

" बापरे आज कितीही झोप "म्हणत उठून खिडकीपाशी आल्या. रात्रभराच्या पावसाने हवेत किंचित गारवा आला होता.

श्रावण महिना अर्धा पार पडला होता सगळीकडे हिरवगार दिसत होतं.

" श्रावण मासी हर्ष मानसी "गुणगुणत् त्या कामाला लागल्या. 

काम ते असे किती? खरं तर दोनच जण होते, ती आणि नातू अथर्व.

अथर्व हा 25 वर्षाचा तरुण मुलगा. राधाबाईं ना वाटत होतं की आता अथर्वने लग्न करावे पण  अथर्वला एकटेपण एन्जॉय करायचं होतं.

अथर्व कामावर गेल्यावर राधाबाई परत खिडकीशी येऊन उभ्या राहिल्या. पाऊस पूर्णपणे थांबला होता, खिडकीतून बाहेर ची दुकाने दिसत होती. राखीपोर्णिमा जवळ आल्याने रहदारी वाढली होती, नारळ ,राख्या ,रुमाल, इत्यादी वस्तुंनी दुकाने सजली होती.

बऱ्याच बायका व मुली राखीची खरेदी करत होत्या. सुंदर सुंदर राख्या लहान मुलांना आकर्षित करत होत्या.त्या रंगबिरंगी राख्या पाहता पाहता राधाबाईं चे मन लहानपणात पोचले.

चार भावांची धाकटी बहीण राधा उर्फ लाडोबा आणि लाडाने हट्टी झालेली, वडील तात्या कडक स्वभावाचे, आई ही त्यांना घाबरत असे.

राधाच्या तात्यांचे सराफ्यात दुकान होते. रहायला मोठा वाडा होता. वाड्यात काही भाडेकरूही होते. 

एकूण श्रीमंती होती. रघुचा परिवार ही त्यात भाड्याने रहात होता. 
रघुचे बाबा तात्यांच्याकडे कारकून होते. हिशोब लिहायचे, रघु एकटाच मुलगा त्यांचा.

रघुची आई कसल्या आजाराने दोन वर्ष आधीच गेली होती, काही सणवार असला की रघुला खूप एकटं वाटत असणार म्हणून राधाची आई नेहमी त्याला आपल्या घरी बोलावून घेत असे व सर्वांबरोबर प्रेमाने जेवायला घालत असे.

राखी असो किंवा भाऊबीज मोठ्या भावां बरोबर रघुला पण राधा ओवाळत असे . 
राधा मोठ्या मोठ्या राख्या आणत आणी मग त्या बांधून झाल्यानंतर मिळणारे पैसे ती डब्यात घालून ठेवत असे.
रघु मात्र तिला हाताने बनवलेली वस्तू देत असे. या प्रेमाच्या बांधलेल्या रेशीमगाठींना प्रेमाचे बंधन मानून रघुनेही पुढे भावाचे कर्तव्य पार पाडले.

राधाला तिच्या लग्नाचा प्रसंग आठवला.

राधा कॉलेजच्या पहिल्या वर्षात होती तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये नाटक बसवले होते, त्यात राधाला मुख्य नायिकेचा रोल तर मोहनला नायकाची भूमिका मिळाली. 
मोहन चे बाबा हे राधाच्या वडिलांप्रमाणे सोन्या चांदीचे व्यापारी होते. दोघांमध्ये खूपच चढाओढ होती.

गॅदरिंग संपले. राधा मोहन ची जोडी हिट झाली. दोघं प्रेमात पडले.

राधाच्या घरी कळले ,मोहन चे वडील पण बाबांशी येऊन भांडले. घरातला ताण वाढला. 
राधाचे बाहेर निघणे बंद झाले व तिच्यासाठी स्थळ पाहणे सुरू झाले, तेव्हा रघुनी तिला साथ दिली.

मोहनला निरोप गेला रघु च्या साह्याने राधाने घर सोडले व मोहन बरोबर निघून गेली.

राधा मोहनचा संसार सुखाचा झाला पण घरच्यांनी त्यांच्याशी संबंध कायमचे तोडले ,आणि रघु, त्याला या सगळ्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागली. 
रघु च्या बाबांना कामावरून काढून टाकले व घर ही सोडावे लागले. पुढे रघु कुठे गेला हे कळायला काहीच मार्ग उरला नाही.

राधा मोहनच्या संसार रुपी वेलीवर रूपा नावाचे गोंडस कळी उमलली. दिसामासाने वाढत तिच पूर्ण फुल झाले. 
पुढे तिचं लग्न मोठ्या थाटा ने झाले. पण या सर्व काळात राधाच्या माहेरून किंवा सासरून कोणीही आले नाही. रूपा व जावई दोघ बाहेरच्या देशात स्थायिक झाले.

राधा व मोहन दोघंच उरले .राधाला नेहमी वाटायचे एकदा तरी माहेरच्यांनी यावे पण ते तिला कायमचेच विसरले जणू .

दरवर्षी राखी, भाऊबीज राधाची सूनी सूनी जात असे.

रघुला ही पाहून बरीच वर्ष झाली, राधा मोहन च्या लग्नाच्या वेळी कोर्टात भाऊ म्हणून सही करायला उभा होता रघु, पण त्यानंतर तोही कधीच भेटायला आला नाही.

काळ आपल्या गतीने पुढे पुढे सरकत होता, एकेक जण काळाच्या पडद्याआड जात होती माहेरचे ही कोणी उरलं नाही .

जीवाला जीव देणारा मोहन ही अचानक साथ सोडून गेला राधा सैरभैर झाली.

मुलगी आणि जावई दोघे विभक्त झाले. एक नातू अथर्व होता तो आई-बाबांच्या भांडणाला कंटाळून माय देशी परत आला आणि आजी सोबत राहू लागला.

"आजी काय पाहते आहे बाहेर खिडकीपाशी उभे राहून? पाय दुखतील तुझे."
अथर्वच्या आवाजाने राधा भानावर आली.

"आजी मला कोणी बहीण असती तर तिने मला राखी बांधली असती ना? पण जाऊ दे आम्ही आमच्या एनजीओ तर्फे आश्रमातल्या मुलींकडून राखी बांधून घेणार आहोत. 
तिथे त्या मुली स्वतः राख्या तयार करून विकतात. तेवढीच त्यांची कमाई आणि हो, तिथेच एक वृद्धाश्रम पण आहे तिथेही जायचे आहे तू चलशील?
घरी बसून तुला उगाचच उदास वाटतं ."

"मी काय करू रे येऊन?"

"अगं बघ तर तिथे रहाणारे वृद्ध आपल्या माणसांची वाट पाहत असतात."

"बर चलते, बरोबर आपण काही मिठाई घेऊन चलू ."

राधा वृद्धाश्रमाची पायरी चढली तेव्हा तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर होते. कसे राहत असतील ही माणसे आपल्या स्वजनांपासून? त्यांना अशा सणावाराला नक्कीच घरच्यांची आठवण येत असेल!

"आजी हे बघ समोर ऑफिस आहे, चल तिथेच बस तू. मी जरा इथल्या लोकांना भेटून विचारपूस करून येतो, बघतो बर राखीची तयारी झाली का!"

"साने साहेब आलेले दिसत नाहीये?" तिथल्या एका सेवकाला अथर्वने विचारले .

"येतीलच थोड्या वेळात."

"बरं आजी मी पाहून येतो" म्हणून अथर्व निघून गेला.

राधा तिथल्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेले फोटो पाहत होती देणगीदारांची नावे त्यांच्या खाली होती.

तेवढ्यात मागून आवाज आला ,आवाज ओळखीसारखा वाटला म्हणून राधाने वळून पाहिले.

समोरची व्यक्ती कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते म्हणतत राधा पुढे सरकली.

"राधा तू म्हणजे तुम्ही राधा?"

"तू?? रघु म्हणजे तुम्ही रघु ?"

बोलता बोलता राधाच स्वर अत्यानंदाने भिजला होता.

"हो मी रघुच पण तू इथे?"

"आणि तू?"

"मी इथली व्यवस्था पाहतो. तू इथे ?"

"अरे मी नातवा सोबत ,म्हणजे माझा नातू अथर्व."

"अच्छा तो खूप चांगला होतकरु कार्यकर्ता आहे आमच्या संस्थेतला."

."आज तोच म्हणाला म्हणून मी सहज पाह्यला आले आश्रम.!'

"बघ कसा योगायोग, इतकी वर्ष तुला शोधत होतो पण आज या इथे तू भेटशील हा दैवी संकेतच नाही का ?"

"बस खुर्चीवर आणी सांग कुठे होतास इतकी वर्षे?" राधा ने रघु चा हात धरुन विचारले.

"गाव सोडून आम्ही शहरात गेलो. तिथे बाबांनी नोकरी शोधली व माझे शिक्षण पूर्ण केले ,मी शिकत असताना च पार्टटाईम नौकरी केली, बाबांना मात्र माझा उत्कर्ष पाहता नाही आला ते अचानक गेले. काही वर्ष मी बाहेर देशात स्थायिक होतो."

"लग्न केले ?"

"नाही मनासारखी भेटली नाही. काही वर्षांपूर्वी च परत आलो. आता इथले काम पहातो.
तू कुठे होतीस इतके वर्ष?"

"मोहन ची फिरती ची नौकरी मग दर दोन तीन वर्षांत बदली, शेवटी इथे स्थायिक झालो आणि तो --" सांगताना राधाच्या डोळ्यात पाणी आले.

रघू ने तिच्या पाठीवर हात ठेवला.

"बघ ना त्याही वेळी माहेरच कुणी जवळ नव्हत. मुलगी पण्-- जाऊ दे आज आनंदाचा दिवस आहे.
इतकी वर्ष वाट पाहिली राखी भाऊबीज अगदी सूनी जात होती ".

"आज राखी बांधणार ना मला?रघू ने विचारले?"

तेवढ्यात अथर्व आत येत म्हणाला, " साने साहेब चला हॉलमध्ये रक्षाबंधन सुरू आहे पाहायला येताना ?"

"हो तर आज माझी ही बहीण आली मग आज तर मी पण पाटावर बसणार आणि राखी बांधून घेणार, काय राधा ?"
असे म्हणत राधा अथर्व आणी रघु तिघे हॉल कडे वळले.

राधा ने रघू ला "प्रेमाचा धागा" राखी बांधून, भाऊ बहिणी चे नाते आणखिन घट्ट केले व सर्वाचे तोंड गोड केले.

© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

या कथाही अवश्य वाचा

सावट

सासर माहेर 

मी माझी समर्थ आहे




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने