मन झाले विरागी ( भाग २)



©® सौ. प्रतिभा परांजपे





भाग १ इथे वाचा


नीरजच्या येण्याची तारीख जवळ आली. नयनाने त्यांच्या स्वागताची तयारी केली.

नीरज आले, ते श्रावणातल्या मेघा सारखे, थोडे बरसले नी निघून गेले परत दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर. नयनाला काहीही कल्पना न देता.
कुठेतरी काहीतरी चुकतय असे नयनाला आतून जाणवत होते.

"मूठ जितकी घट्ट करावी वाळू तितकीच जास्त हातातून निसटून चाललीये व हातात काहीच उरत नाहीये".
ज्या नीरज सोबत घरटे बांधून तिने संसार करायची स्वप्न पाहिले तो तर प्रवासी पक्षी निघाला, तिला एकटे टाकून तिचा हंस उडून गेला ,परत कधी येईल किंवा नाही व आल्यावरही त्याला स्वतःमध्ये किती काळ गुंतवून ठेवू शकते? ह्याचा काहिच अंदाज येत नव्हता.

निरज च्या मनाचा ही थांग लागत नव्हता. व शरीराचे ऋतुचक्र ही आपल्या हातात नाहीं हे आतून नयना ला जाणवू लागले.

ज्या कारणास्तव तिने अविनाश ला दुखावले तेच सत्य आता तिच्यासमोर उभे होते, पण या वेळेस गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात ती उभी होती.

नीरजला तिने विचारले, तेव्हा मग ते स्पष्ट बोलले, ते तिच्यासाठी स्वतःचं करिअर , Spoil नाही करू शकत. एकाच जागी फार दिवस राहण्याचा त्यांचा स्वभावही नाही, सत्य समोर आले तेव्हा मग नयनाने स्वतः आपणच त्यांना मोकळे करावे असा निर्णय घेतला.

आता आपल्याला एकट्याने आयुष्य काढायचे या कल्पनेने तिच्या मनाचा तोल सुटत होता.

नीरज ने घर नयना च्या नावाने केले होते, आर्थिक काळजी नव्हती पण, आपण हरलो या भावनेने ती खचली.

ऑफिस मध्ये हळूहळू बातमी पसरली. मीनल ने तिला एकट्यात विचारले तेव्हा मात्र नयनाच्या मनाचा बांध फुटला. मीनल च्या गळ्यात पडून तिने मन मोकळे केले.

" सुख मला अशी हुलकावणी का देते, ज्या सुखा साठी मी अविनाश ना सोडले, ते सुख मला नीरज ने दिले पण ते क्षणभंगुर ठरले. माझी ओंजळ परत रिकामीच राहिली. मी इकडची ना तिकडची राहिले"

"अगं पण नीरज ला कां तू सोडते?

"नीरज मना नी माझ्यापासून दूर गेलेत हे मला जाणवते आहे,. त्यांनाबांधून ठेवण्या इतका मजबूत रेशीम धागा माझ्याजवळ नाही ,तेव्हा त्यांना मोकळे करणे हाच पर्याय माझ्यापाशी आहे."

"पण मग आता "?

"अविनाश कडे परतण्याचा मार्ग मी स्वतः बंद केला. पुढचे अजून काहीच ठरवले नाही."

पुढचे काही दिवस नयनाने सुट्टी घेतली. नीरज चे हे मोठे घर सोडून दोन खोल्यांचे छोटे घर भाड्याने घेऊन मोजके सामान घेते या घरात शिफ्ट झाली.

ते घर , त्या सुखद आठवणीं पासून दूर जाण्याचा हा एक असफल प्रयत्न होता

नयनाला सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली. आज तब्येत थोडी बरी वाटत होती. हिम्मत करून तिने स्वतः उठून चहा केला, व बाकीचे आवरले.

आज ऑफिसला जायला हवे कामात दुर्लक्ष करुन चालणार नाही. बॉस सुट्टी संपून परत येण्याच्या आधी पेंडिंग कामे हातावेगळी केलेली बरी.

पुढचे काही दिवस मग नयनाने स्वतःला कामात झोकून दिले, घरी आले की खूप थकलेली असायची

मीनल एक दिवस बोलली ही, " अगं आत्ता कुठे तब्येत सुधारते आहे इतका स्ट्रैस बरा नव्हे", पण जुन्या आठवणीतून बाहेर पडायला हा एकच मार्ग तिला दिसत होता.

ऑफिस मध्ये पोहोचते तो मीनल वाटच पाहत होती. 

"नैना ,काल तू येशील असे वाटले होते"

"अग पण काय झाले ते तर कळू दे."

"म्हणजे तुला काहीच माहित नाही?? अगं संपदा, तुझी लेक, तिचा साखरपुडा होता काल .तुझा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही का"?


नयनाला आतून भरून आले. तिच्या मुलीने अजूनही माफ केले नाही, स्वतःचे सुख शोधताना बरेच काही हरवून बसल्याचे जाणवले. डोळ्यांचे डोह भरून येतात असे वाटताच ती वॉशरूम कडे गेली, उगाचच स्टाफ मध्ये चर्चेला विषय नको.

लंच मध्ये प्यून ने इन्व्हिटेशन कार्ड देत बातमी दिली," उद्या रविवारी, बॉस पार्टी देतात आहे नातू झाल्याची."

नयनाला आताशा पार्टीत जाणे नको वाटत असे ,ती नाही म्हणेल हे ठाऊक होते .
मीनल ने तिला, "मी तुला पिकअप करायला येईन, शार्प बाराला तयार रहा काही कारण सांगू नको" असे म्हणून पार्टीत नेलेच.

पार्टी खूपच भारी होती आर्केस्ट्रा, गाणी, ड्रिंक, जल्लोष, नीरज बरोबर अशा पार्टीज ना ती नेहमी जात असे तेव्हा त्या छान वाटायच्या पण आता सगळाच चार्म गेला.

सक्सेना साहेबांना गाण्याची खुपच आवड ,त्यांनी नेहमीप्रमाणे नयनाला 'आपकी सुरीली आवाज मे, कोई गझल सुनाइये ना' म्हणून आग्रह केला.

नयनाला नीरज ची राहून राहून आठवण येत होती मन ही उदास होते तेव्हा, तिच्या ओठी, "किसी नजर को तेरा इंतजार आज भी है" ही गज़ल होती. 

गाता गाता ती भावनाकुल होत गेली, इतके दिवस मनात लपवलेले दुःख गाण्याच्या रूपात व्यक्त होत होते. अंतरा सुरु होता- होता तिचे अवघे शरीर कापायला लागले. डोळ्यासमोर गडद अंधार पसरला नि ती खाली पडली....

पक्ष्यांचा मधुर कलरव हलके हलके कानावर येत होता, कुणीतरी भूपाळीचे मधुर स्वर छेडत आहे.

"निनू---ऊठ रियाज करायची वेळ झाली." 

आईची हाक व हलकासा स्पर्श जाणवला नी नयनाने डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हते. 

औषधाच्या गुंगीत झालेले भास होते. डोळ्यांच्या कडा भरून आल्या .
तिची चाहूल लागताच नर्सने पुढे येऊन तिचे बी.पी. तपासले व हसून गुड मोर्निंग केले.

आठ च्या सुमारास मिनल ने तिला हाक मारली. 
मीनलला पाहतात नयनाने प्रश्नांचा भडिमार केला. तिला जवळ घेत शांत करत मीनल ने तिला तब्येतीविषयी सांगितले. 
माइल्ड हार्ट अटॅक आला होता,पार्टीत ती बेशुद्धपडली ते चार दिवसांनी शुद्धीवर आली.

कालपर्यंत मीनल सतत दवाखान्यात ये,जा करत होती. आज आय .सी. यु मधून स्पेशल रूम मध्ये नयना शिफ्ट झाली.

मीनल कडूनच तिला अविनाश व आई येऊन गेल्याचे समजले, पण नीरज-- कोण जाणे मन अजूनही त्याच्यातच गुंतले आहे पण, त्याला कुठे पर्वा आहे? नयना चे डोळे परत भरून आले, हृदयाचे ठोके वाढायला लागले.


नयनाची मेडिकल लिव्ह एप्लीकेशन साईन करून मीनल गेली. अजून वीस दिवस तरी दवाखान्यातून सुट्टी नाही. डॉक्टर दोन्ही वेळेस येत असत.

एक दिवस त्यांच्यासोबत एक मनोरोगतज्ञ डॉ. होत्या . नयनाला तपासल्यावर त्यांनी तिला "तू काही दिवस विश्रांती व तब्येत सुधारण्यासाठी मालेगावच्या विपश्यना केंद्रात रहा .तिथे तुला बरे वाटेल." असा सल्ला दिला.

मीनलने पण वातावरण बदल झाला की मन शांत होईल असा सल्ला दिला. तुझे तिथे जाणे मी नक्की करते अशी आशाही दाखवली तेव्हा मग नयनाने ही मनावर घेतले.-

सुखाच्या शोधात अनेक प्रयत्न करूनही नयनाला सुख मिळालं कां,? सुखाचा असा ठरलेला कोणताच मार्ग नसतो. आयुष्यात ते सुख कुठल्या मार्गाने येईल हे समजणे कठीण.

मालेगांवचे हे विपश्यना केंद्र, शहराबाहेर असलेलं. मोठ्ठा शांत आवार,  बाग बगीचा,बागेत अनेक पक्षी, एकूणच मन प्रसन्न होईल असे वातावरण.

जवळजवळ तीस ते पस्तीस मेंबर या दहा दिवसाच्या विपश्यने साठी केंद्रात आलेले होते.

पहिले तीन दिवस 'आनापाना' करून चित्ताची एकाग्रता साधून मनातील विकार दूर कसे करावे याचे प्रशिक्षण दिले गेले. या दहा दिवसात मौन पाळावे लागेल असे सांगितले.

सायंकाळी सात ते नऊ गुरुजींचे व्हिडिओद्वारे प्रवचन असे, गुरुजी संवाद साधून या साधनेचे मूळ काय याचे विश्लेषण करत. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे प्रवचन हा एक प्रसादच होता.

गुरूजी सांगत "मन आणि शरीर याचा निकटचा संबंध असल्याने, शरीरात होणाऱ्या बदलाचे कारण चित्ता मध्ये आहे ,तेव्हा हे मूळ दूर केल्याशिवाय मनाची अस्वस्थता दूर होऊन शकत नाही.
मन आंतरीक दृष्ट्या पूर्ण शुद्ध झाले म्हणजे दुःखाने कोलमडत नाही व सुखाने वाहवत नाही"

हे दहा दिवसांचे शिबिर व, ही विपश्यना ची साधना करता करता नयनात खूप बदल होत गेले. आतून" फिलगुड" वाटू लागले.दहा दिवस बाहेर च्या जगाशी काहिही संबंध नव्हता.

दहा दिवसाचे मौन पाळूनही थकवा जाणवत नव्हता. पुढचे दोन-तीन दिवस नयना तिथेच राहिली.

इतर साधकांशी परिचय झाला त्यातच डॉक्टर रोहिणी ताईंशी विशेष ओळख झाली.

ताई "तुम्ही gynecologist मग इथे का?" 
तेव्हा ताई म्हणाल्या "डॉक्टर ही शेवटी मनुष्यच नाही का? डिलिव्हरीच्या केसेस हाताळताना त्यांनाही ताण-तणाव असतातच ,बऱ्याच दा तुमच्यापेक्षा जास्तच", म्हणून मी दरवर्षी दहा दिवस येते रिफ्रेश होते खूप छान वाटते.
कामाचा परत उत्साह येतो आपले स्ट्रॉंग व वीक पॉईंट ही लक्षात येतात.

तूही तुझे स्ट्रॉंग पॉईंट लक्षात घे. तुझा आवाज अत्यंत मधुर आहे. तुझ्याजवळ संगीताची डिग्री आहे तुझी ताकद तू ओळख आणि त्या दिशेने प्रयत्न कर. इथून पुढे परत त्याच गुंत्यात नको गुंतू.

एक संस्था आहे तिथे म्युझिक थेरपी चे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे तू डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन कोर्स करू शकते यांनी तुला जगण्याची नवीन दिशा मिळेल."

नयनाला रोहिणी ताईंच्या रूपात एक मार्गदर्शक भेटला.

या मधल्या काळात मीनलशी तिचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता तिला कळवून सुट्टी ,विदाऊटपे ची एप्लीकेशन पाठवली. व म्युझिक थेरपी ऍकॅडमी दिल्ली च्या ट्रेनिंग सेंटरला फोन करून ऍडमिशन घेतली.

दिल्लीचे म्युझिक थेरपी सेंटर, एक आणखीनच नवा अनुभव ,नवीन आयुष्य .

रोज सकाळी पाच ते सात गाण्याचा रियाज गुरुजींसमोर.

खूप वर्षांनी तानपुरा घेऊन वरचा सांs लावताना एक अनामिक आनंद वाटत होता. सुरुवातीला न जमणारा सांs हळूहळू जमू लागला एक एक राग, त्यांचे स्वर माधुर्य, त्या कोमल स्वरांनी मन व हृदयाच्या ठोक्यात होणारे बदल हे ती स्वतः अनुभवू लागली.

प्रत्येक रागाची वेळ व त्यांच्या स्वरातील उतार-चढाव यांनी शरीराच्या प्रत्येक अवयवांवर होणारे परिणाम, असे अनेक नवे पैलू समोर येऊ लागले.

आईच्या आग्रहाखातर लहानपणी शिकलेले संगीत आज नव्या रूपाने नयना अनुभवत होती.

रोजच्या नियमित रियाज़ा ने नयनाचा आवाज ही स्पष्ट - साफ होत गेला. नयनाला जगण्याची नवी दिशा मिळाली.

या सहा महिन्याच्या कोर्सनंतर नयनाने रोहिणी ताईंच्या सल्ल्यानुसार म्युझिक थेरपिस्ट म्हणून एका मनोरोग हॉस्पिटल ला एप्लाय केला, रोहिणी ताईंनी राहण्याचीही व्यवस्था केली.

चार दिवस पुण्याला जाऊन‌ नयना परत दिल्लीला आली.

मीनल ला तिने नोकरीचा राजीनामा आधीच पाठवला होता .

मागचे सर्व सोडून त्यातून बाहेर पडून नव्या आयुष्याची सुरुवात करायसाठी हा नवा मार्ग.

मनाचे स्वास्थ्य मिळवण्यासाठी नयनाला नव्या दिशेने वाटचाल करायची होती.

संगीताशी सूर जुळवून जनसेवा करायची, संसारातले सगळे- सगळे राग, अनुराग विसरून आता नयनाचे मन विरागी झाले होते.

समाप्त

©® सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!

📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

या कथाही अवश्य वाचा

नकोतच सोपस्कार फक्त


निर्णय


कर्माचे फळ



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने